मुंबई-नागपूर मार्गावर खड्ड्यांची चाळण : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:44 AM2018-09-05T11:44:21+5:302018-09-05T11:44:27+5:30

तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर जलदगती महामार्गाची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Pitches on the Mumbai-Nagpur route: The neglect of the construction department | मुंबई-नागपूर मार्गावर खड्ड्यांची चाळण : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मुंबई-नागपूर मार्गावर खड्ड्यांची चाळण : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

googlenewsNext

रोहित टेके
कोपरगाव : तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर जलदगती महामार्गाची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे.
मुंबई-नागपूर जलदगती महामार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार करून त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम देखील याच महामंडळाच्या औरंगाबाद येथील कार्यालयाच्या माध्यमातून होत असे.कालांतराने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम हे ज्या त्या कार्यक्षेत्रात येणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आणि त्याच दिवशी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग,कोपरगाव यांच्या अंतर्गत देखभाल दुरुस्तीकरिता अंदाजे १६ किलोमीटर पुणतांबा चौफुली ते तळेगाव मळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यावर खड्ड्याचे एवढे प्रमाण वाढले आहे की वाहने तर सोडाच पायी चालणे देखील अवघड झाले आहे. दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्यांवर मोठमोठी काटेरी झुडपे वाढली आहेत. डांबरी रस्त्याच्या पृष्ठभागावर तर अक्षरश: खड्ड्यांची मालिकाच झाली आहे.त्यामुळे हे खड्डे चुकविण्याच्या नादात आजवर कित्येक अपघात झाले असून वाहने अडवून चोरीच्या घटना घडल्या आहेत.

या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कारण खड्डे चुकविण्याच्या नादात केव्हा एखादे मोठे वाहन कधी धडक देईल हे सांगता येत नाही. या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी संबंधित विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु खड्ड्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. दुरुस्त केलेले खड्डे देखील काही दिवसातच ‘जैसे थे’ होतात. त्यामुळे रस्त्याचे काम होतानाच त्याची गुणवता तपासल्यास पुन्हा पुन्हा काम करण्याची गरज भासणार नाही.
-स्वप्नील वलटे, ग्रामस्थ, दहिगाव बोलका, ता.कोपरगाव.


३ जानेवारी २०१७ रोजी भारत सरकारने परिपत्रक काढून राष्ट्रीय महामार्ग (७५२ आय) घोषित केला. परंतु राज्य शासनाने हा मार्ग केंद्राकडे वर्ग करण्यासाठी निविदा काढणे गरजेचे आहे. परंतु ती अद्यापपर्यंत काढली नसल्याने प्रलंबित आहे. परंतु यावर तत्काळ उपाय योजना म्हणून राज्य शासनाकडे विशेष रस्ता दुरुस्तीसाठी ५.५ कोटी मागणीचा प्रस्ताव पाठवला असून निधी मिळाल्यानंतर लगेचच दुरुस्तीचे काम सुरु होईल.
-प्रशांत वाकचौरे, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगाव.

Web Title: Pitches on the Mumbai-Nagpur route: The neglect of the construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.