कामगारांची चर्चा निष्फळ
By admin | Published: September 23, 2014 10:54 PM2014-09-23T22:54:03+5:302014-09-23T23:03:04+5:30
अहमदनगर : ऊस तोडणी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घ्यावे, यासाठी साखर संघाच्यावतीने आयोजित बैठक मंगळवारी निष्फळ ठरली.
अहमदनगर : ऊस तोडणी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सुरू असलेले काम बंद आंदोलन मागे घ्यावे, यासाठी साखर संघाच्यावतीने आयोजित बैठक मंगळवारी निष्फळ ठरली. यामुळे तोडणी कामगारांचा संप सुरू राहणार असून १८ आॅक्टोबरनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी दिली.
मंगळवारी सायंकाळी पुण्याला साखर संघात कामगार युनियनला संप मागे घेण्यासाठी चर्चेला बोलविण्यात आले होते. यावेळी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, साखर आयुक्त शर्मा यांच्यासह साखरसंघाचे कार्यकारी संचालक आणि सचिव उपस्थित होते.
यावेळी संघाच्यावतीने ऊस तोडणी कामगार युनियनने संप मागे घेण्याची विनंती करण्यात आली. कामगार युनियनच्या ज्या मागण्या आहेत, त्या साखर संघाच्या अखत्यारित नसून त्यासाठी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा आवश्यक आहे. सध्या हे वरिष्ठ अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याबाहेर आहेत. ते १८ आॅक्टोबरला येणार आहेत.
त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हे कामगार युनियनला मान्य नसल्याने सध्यातरी ऊस तोडणी कामगार संप मागे घेणार नसल्याचे युनियनचे अध्यक्ष थोरे यांनी साखर संघाचे पदाधिकारी आणि मंत्री पाटील यांना सांगत १८ आॅक्टोबरनंतर निर्णय घेण्याचे स्पष्ट केले.
यावेळी ऊस तोडणी कामगार, मुकादम व वाहतूक संघटनेचे संचालक मंडळाचे बबन पालवे, रामदास पानवळ, बाबासाहेब घायतडक, पांडुरंग पाखरे, सुरेश पाखरे, नवनाथ पवार, रघुनाथ कारखले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)