जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या झाली दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:44 IST2017-09-29T23:43:56+5:302017-09-29T23:44:08+5:30
जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसागणिक पटसंख्या कमी होत आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बंदसुद्धा झाल्या आहेत.

जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या झाली दुप्पट
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसागणिक पटसंख्या कमी होत आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बंदसुद्धा झाल्या आहेत. एवढी विदारक परिस्थिती जिल्हा परिषद शाळांची असताना काही ठिकाणी मात्र संवेदनशील शिक्षकांनी अनेक नवनवीन ऊपक्रम राबवून तथा कल्पकतेने विद्यार्थी संख्या वाढवून शाळेला झळाळी दिली आहे आणि इतर जिल्हा परिषदांच्या शाळेपुढे आदर्श निर्माण केला आहे.
यामध्ये आर्णी तालुक्यातील महाळुंगी येथील जिल्हा परिषदेची ऊच्च प्राथमिक मराठी शाळा आघाडीवर आहे. या शाळेने अवघ्या चार वर्षात पटसंख्या दुप्पट करून दाखवली. चार वर्षांपूर्वी या शाळेची परिस्थिती गंभीर होती. शाळेच्या पटांगणात जनावरे बसून राहत होती. प्रांगणात झाडे नव्हती, भकास व ऊदास असे वातावरण होते. अनेकदा तर शाळा दुपारनंतर भरत सुद्धा नव्हती. यामुळे पालकांनी शाळेकडे पाठ फिरविली होती. शाळेची विद्यार्थीसंख्या रोडावत चालली होती, २०१३-१४ मध्ये तर पटसंख्या केवळ ११४ वर आली होती. आठ वर्गात फक्त ११४ विद्यार्थी राहले होते. त्याच दरम्यान या शाळेत उपक्रमशिल शिक्षक राजूदास जाधव या शाळेत रुजू झाले. त्यांनी या शाळेची अवस्था पाहली व यातून आपल्या शाळेला नंबर वन बनविण्याचा संकल्प केला.
सर्वात प्रथम शाळेत सुरक्षा भिंत बांधली, पिण्याच्या पाण्यासाठी टाके बांधले, बोरवेल केली, शाळेच्या पटांगणात दोनशे विविध वृक्ष लावले. याला जोपासण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना दिली. सोबतच स्वतंत्र मुत्रीघर, शौचालय, असे वेगवेगळे युनीट बांधले. शाळेतील कचºयापासून खत तयार करण्यासाठी टाके बांधले.
विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग वाढला. शारीरीक विकास व्हावा, म्हणून क्रीडा स्पर्धा व सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, स्वतंत्र वाचन कक्ष, भोजनासाठी व्यवस्था, प्रत्येक वर्गात फॅन आदी सुविधा ऊपलब्ध करन्यात आल्या. खाजगी शाळेला लाजवेल असे काम या शाळेने करुन दाखवले आहे. याचाच परिणाम म्हणून २०१५ मध्ये जिल्ह्यात प्रथमच महाळुंगी जिल्हा परिषदेच्या शाळेने आयएसओ नामांकन मिळविले.
नवनवीन उपक्रम
शाळेत नवनवीन ऊपक्रम राबविण्यात आले. यामध्ये स्वयंशासन, बँकींग, निवडणूक प्रक्रिया, ई-लर्निंग, स्टेज डेअरिंग, स्पर्धा परीक्षा माहिती आदी उपक्रमांचा समावेश होता.
शाळेतील माझे सर्व सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आम्ही आमच्या शाळेला हे वैभव मिळवून देऊ शकलो.
- राजूदास जाधव
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, महाळुंगी