यवतमाळातील ऐतिहासिक वास्तू कुलूपबंद
By Admin | Updated: May 27, 2014 01:09 IST2014-05-27T01:09:19+5:302014-05-27T01:09:19+5:30
आचार्य विनोबा भावे यांनी राबविलेल्या भूदान चळवळीला सर्वाधिक प्रतिसाद यवतमाळ जिल्ह्यात मिळाला. शेतकर्यांनी दान दिलेली शेतजमीन भूमिहीन कुटुंबाला वाटप करण्यात आली.

यवतमाळातील ऐतिहासिक वास्तू कुलूपबंद
भूदान चळवळ : पंडित नेहरुंची भेट, स्मृतिदिनी तरी खुले होईल काय उद्यान
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
आचार्य विनोबा भावे यांनी राबविलेल्या भूदान चळवळीला सर्वाधिक प्रतिसाद यवतमाळ जिल्ह्यात मिळाला. शेतकर्यांनी दान दिलेली शेतजमीन भूमिहीन कुटुंबाला वाटप करण्यात आली. या ऐतिहासिक क्षणाचे क्षणाचा शुभारंभ यवतमाळातून झाला. यासाठी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना निमंत्रित करण्यात आले होते. अशा या स्थळाची साक्ष देणारी वास्तू यवतमाळात उभी आहे. मात्र ती कडेकोट कुलूपात बंदिस्त आहे. त्यामुळे नवी पिढी या ऐतिहासिक घटनेच्या माहितीपासून कोसो दूर आहे. मध्य प्रदेशात जमिनदार आणि भूमिहीनांमध्ये चांगलेच वादंग निर्माण झाले होते. हा पेच सोडविण्यासाठी आचार्य विनोबा भावेंना बोलविण्यात आले होते. त्यावेळी विनोबा भावेंनी दोन्ही बाजू एकून घेतल्या आणि जमिनदारांना आपल्याकडील जमीन दान मागितली. यावेळी आचार्य विनोबा भावे यांनी केलेले वैचारिक परिवर्तन जमिनदारांनाही मनातून भावले. त्यावेळी जमिनदारांनी आपल्याकडील काही जमीन विनोबा भावेंना दान दिली. त्यांनी ही जमीन भूमिहीन कुटुंबात वाटप केली. विनोबा भावे यांचे हे काम सर्वांना प्रेरणादायी ठरले. यानंतर हा प्रश्न इतरही ठिकाणी भेडसावल्याने त्यावेळी विनोबा भावे यांनी पवनार येथून पदयात्रा काढली. प्रत्येक गावी त्यांनी वैचारिक परिवर्तनाचं कामं केलं आणि जमिनदारांना जमीन दान मागितली. ही भूदान चळवळ गावखेड्यात पोहोचली. याच चळवळीला यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. याठिकाणी एक लाख ३७ एकर शेतजमीन विनोबांना दान करण्यात आली. मिळालेले भूदान भूमिहीनांना देण्यासाठी कार्यक्रमही तयार करण्यात आला. त्यासाठी पंडित नेहरू यांना १८ एप्रिल १९५९ रोजी यवतमाळात निमंत्रित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. यावेळी झालेली सभा प्रचंड गाजली. या सभेनंतर भूदानातील जमिनीचे वाटप भूमिहीनांना करण्यात आले. त्यामुळे हा दिवस जिल्ह्यातील नागरिकांसाठी ऐतिहासिक आहे. यवतमाळच्या गोदणी मार्गावर सध्याच्या आकाशवाणी केंद्रालगत ही सभा झाली होती. यवतमाळ नगरपरिषदेने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानांतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू स्मृतिमंच आणि उद्यान नावाने जागेचे सौंदर्यीकरण केले. याठिकाणी पंडित नेहरूंची झालेली सभा भिंतीवर छायांकित करण्यात आली. यासोबतच या सभेला उपस्थित मान्यवरांचे चित्रही आहे. ही ऐतिहासिक वास्तू उद्यानाच्या माध्यमातून अधिक खुलविण्यात आली आहे. मात्र हे सर्व सौंदर्य कुलूपबंद करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी आहे तरी, काय याची माहिती कुणालाही कळत नाही. सदर उद्यान सदैव खुले राहिल्यास तरुण पिढीला ऐतिहासिक वास्तूची कल्पना येईल. मात्र लागलेल्या कुलपाने इतिहास बंदिस्त झाला आहे. पंडित नेहरू यांचा मंगळवारी स्मृतिदिन आहे. या दिवसी तरी, नगरपरिषदेने ही वास्तू आणि उद्यान खुला करण्यासाठी पावले उचलले तर पंडित नेहरूंना खरी श्रध्दांजली ठरेल.