महागाव येथे कृषी केंद्रांवर धाड
By Admin | Updated: June 13, 2017 01:17 IST2017-06-13T01:17:05+5:302017-06-13T01:17:05+5:30
शासनाकडून बंदी असलेल्या नकली बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर धाड टाकून ते सील करण्यात आले.

महागाव येथे कृषी केंद्रांवर धाड
सील ठोकले : नकली बियाण्यांची विक्री, मुडाणा येथेही कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : शासनाकडून बंदी असलेल्या नकली बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रांवर धाड टाकून ते सील करण्यात आले. ही कारवाई सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी बी. आर. कळसाईत यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
महागाव येथील विनोद पावडे यांच्या मालकीच्या लक्ष्मी कृषी केंद्रामध्ये शासनाकडून बंदी असलेले राशी ६५९ हे बियाण्याची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. या धाडीत राशी ६५९ चे ४४ पाकिटे आढळून आले. ही पाकिटे जप्त करून या दुकानाला सील ठोकण्यात आले.
त्यानंतर महागाव येथून पाच-सहा किलोमिटर असलेल्या मुडाणा येथील गावंडे यांच्या मालकीच्या मीता कृषी केंद्रावरही धाड टाकण्यात येऊन येथून राशी ६५९ चे सहा पॉकीट जप्त करण्यात आले. या परिसरातील इतरही कृषी केंद्रांना भेटी देण्यात आल्या, परंतु त्या ठिकाणी काही आढळून आले नाही. या कारवाईमुळे बोगस बियाण्यांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री होत असून यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. उल्लेखनिय म्हणजे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी यवतमाळहून जाऊन कारवाई केली. त्यामुुळे तालुका कृषी विकास अधिकारी नेमके काय करतात, तसेच कृषी विभागाकडून नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाचे अस्तित्व काय, हे प्रश्नचिन्ह या निमित्ताने निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांसह या कारवाईच्या वेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षही उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी आर. बी. रणवीर यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांना वरिष्ठांकडून समज देण्यात आली.