भटकंती करीत लिहिली ८0 पुस्तके
By Admin | Updated: May 13, 2014 00:14 IST2014-05-13T00:14:18+5:302014-05-13T00:14:18+5:30
अवतीभोवतीचे वास्तव पाहून त्यांचे मन शाळेत लागत नव्हते. दहाव्या वर्गातच त्यांनी शाळेला सोडचिठ्ठी दिली. हे विश्वची माझे घर म्हणत संसाराचा त्याग केला.

भटकंती करीत लिहिली ८0 पुस्तके
आर्णी : अवतीभोवतीचे वास्तव पाहून त्यांचे मन शाळेत लागत नव्हते. दहाव्या वर्गातच त्यांनी शाळेला सोडचिठ्ठी दिली. हे विश्वची माझे घर म्हणत संसाराचा त्याग केला. पवनारच्या आश्रमात विनोबाजींच्या सानिध्यात तब्बल १५ वर्षे घालविली. त्या ठिकाणी मिळालेल्या दृष्टीमुळे देशाच्या कानाकोपर्यात भटकंती केली. यातून त्यांना नवी दृष्टी मिळाली. यातूनच जवळपास ८0 पुस्तकांना त्यांनी जन्म दिला. मूळच्या नाशिक जिल्ह्यातील श्रावण शिरसाठ यांची भटकंतीची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नुकतेच श्रावण शिरसाठ आर्णी परिसरात येवून गेले. जीवनात सुखासाठी प्रत्येकजण धडपड करतात. मात्र या धावपळीतून माणसे निराशेच्या गर्तेत सापडतात. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या माणसांना प्रबोधनाची दिशा देण्यासाठी भटकंती करणार्या श्रावण शिरसाठ यांनी हाती लेखणी घेतली आहे. बालपाणापासूनच त्यांच्या जीवनावर विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी पवनार येथील आश्रमात वास्तव्य केले. विनोबाजींच्या सहवासामुळे त्यांच्या डोळ्यांना नवी दृष्टी आली. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात भटकंती करतच हिमालय पर्वातावर एक वर्ष वास्तव्य केले. दक्षिण भारत, पॉन्डेचरी आश्रम, अरविंद घोष आश्रम, नर्मदा परिक्रमा आदी ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर दिग्रस तालुक्यातील साखरा या गावी बिजमवार कुटुंबाकडे ४२ वर्षे घालवीली. अशातच इसापूर येथील व्यसनमुक्ती सम्राट मधुकर खोडे महाराज यांचा सहवास लाभला. त्यांच्या व्यसनमुक्तीच्या कार्याने प्रेरित होवून व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी श्रावण शिरसाठ यांनी पुस्तके लिहिण्यास प्रारंभ केला. मधूबिंदू, शेवटची पायरी या पुस्तकातून व्यसनमुक्तीवर प्रहार केलेत. आजतागायत त्यांनी जीवनाच्या आचारसंहितेचे दिग्दर्शन करणारी जवळपास ८0 पुस्तके लिहिली आहेत. सुखानंद बोध, विचारचक्र आदी पुस्तकांनी समाजमनावर वेगळी छाप पाडली आहे. नर्मदा परिक्रमा या पुस्तकातून त्यांनी जीवनाचा आनंद अधोरेखित केला आहे. वयाची पंचात्तरी गाठल्यानंतरही समाज प्रबोधनाचा त्यांचा वसा कायम आहे. आज इथे तर उद्या तिथे हा त्यांचा नित्यक्रम आहे. गावागावात हातभट्टय़ांचा धूर निघत आहे. सहज उपलब्ध होणार्या दारूमुळे युवा पिढी नशेच्या आहारी जात आहे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. गावांमध्ये भांडणतंटे वाढले. प्रसंगी जीवावर बेतण्याच्या घटनाही घडत आहे. या बाबींना कुठेतरी पूर्णविराम मिळावा, यासाठीच श्रावण शिरसाठ यांचा प्रयत्न आहे. गाव व्यसनमुक्त होवून शांती नांदावी, यासाठीचे त्यांचे प्रयत्न नागरिकांच्या सहकार्याने यशस्वीही होत आहे. (शहर प्रतिनिधी)