पांढरकवड्याची काटकसर इतरांना का जमली नाही ?

By Admin | Updated: May 14, 2016 02:22 IST2016-05-14T02:22:21+5:302016-05-14T02:22:21+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पांढरकवडा विभागाने काटकसर करून अवघ्या सात लाखांच्या खर्चात वर्ष भागविले.

Why did not others get the breadth of the light? | पांढरकवड्याची काटकसर इतरांना का जमली नाही ?

पांढरकवड्याची काटकसर इतरांना का जमली नाही ?

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील उधळपट्टी : केवळ सात लाखांत वर्ष भागविले
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पांढरकवडा विभागाने काटकसर करून अवघ्या सात लाखांच्या खर्चात वर्ष भागविले. या उलट अन्य विभागांनी खर्चाचा हा आकडा १२ ते १६ लाखांवर नेला. पांढरकवडा विभागाला जमलेली काटकसर अन्य विभागाला का करता आली नाही, असा प्रश्न या निमित्ताने सहकार क्षेत्रात उपस्थित केला जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या वर्षभरात चहापान, वाहन व भत्त्यांवर तब्बल तीन कोटी ७२ लाख २० हजार रुपयांचा खर्च केला. त्यात यवतमाळ मुख्य कार्यालय आणि पाच विभागीय कार्यालयांचा समावेश आहे. त्यात सर्वाधिक १६ लाखांचा खर्च वणीचा तर सर्वात कमी सात लाखांचा पांढरकवडा विभागाचा आहे. पांढरकवडा विभाग अवघ्या सात लाखांत वर्षभराचा खर्च भागवू शकते तर अन्य विभागांना ते का शक्य झाले नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
काटकसरीतूनही शेतकऱ्यांचा सन्मान - अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर
पांढरकवडा विभागाने खर्चाच्या काटकसरीचा नेमका कोणता पॅटर्न राबविला याबाबत जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा पांढरकवडा विभागीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अनेक बाबी सांगितल्या. अ‍ॅड. मानकर म्हणाले, मी सहसा राळेगावच्या बँक शाखेत जात नाही, गेलो तरी कामकाजाच्या चौकशीच्या अनुषंगानेच जातो. पांढरकवडा विभागीय कार्यालयात जाताना घरुन जेवणाचा डबा घेऊन जातो. बँकेऐवजी स्वत:चे वाहन, चालक वापरतो. माझेच अनुकरण अन्य संचालकही करतात. कधी बँक शाखेचा खर्च अतिरिक्त वाटल्यास लगेच संबंधित व्यवस्थापकाला जाब विचारला जातो. आवश्यकता असेल तेथेच खर्च केला जातो. आमचा विभाग लहान असल्याने तसाही खर्च कमीच होतो. संचालकांपासून व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच काटकसरीचे धोरण अवलंबिल्याने अवघ्या सात लाखात वर्षभराचा खर्च भागविता आला. हा खर्च आणखीही कमी करता येतो का या दिशेने प्रयत्न केले जाणार आहे. बँकेचे कर्जदार व ठेवीदार असलेल्या शेतकऱ्यांचा मात्र पांढरकवडा विभागीय शाखेत चहापान करून योग्य तो सन्मान राखला जात असल्याचे मानकर यांनी सांगितले. असाच सन्मान सर्व शाखेत ठेवण्याबाबत आपण प्रस्ताव दिला होता. मात्र सध्या तरी त्याची अंमलबजावणी केवळ पांढरकवडा विभागातच नियमित सुरू असल्याचे प्रफुल्ल मानकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

शेतकऱ्यांनी व्यवस्थापकांना धारेवर धरले
‘दुष्काळातही शेतकऱ्यांच्या बँकेत उधळपट्टी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताचा परिणाम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवसभर जाणवला. तुमच्याकडे वारेमाप खर्चासाठी पैसा आहे, तुम्ही उधळपट्टी करता, मौजमजा करता आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही अशा शब्दात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पाईक असलेल्या ठेकेदारांनी व्यवस्थापनाला सुनावल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेचा वर्षभरातील चहापान, वाहन, भत्त्यांवरील पावणे चार कोटींच्या खर्चाचा लेखाजोखा ‘लोकमत’ने उघड केल्याने शेतकरी वर्गात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

वणीत संचालकाच्या मुलाची चलती
वणी विभागीय कार्यालयात एका संचालकाच्या लिपिकवर्गीय मुलाचीच सर्वाधिक चलती असल्याचे बँकेच्याच यंत्रणेतून सांगितले जाते. बँकेचा बहुतांश कारभार या मुलाच्याच इशाऱ्यावरून चालत असल्याने यंत्रणा त्रस्त असल्याची ओरडही ऐकायला मिळत आहे.

Web Title: Why did not others get the breadth of the light?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.