तिकीट चोरीतील संशयित ४४३ वाहकांवर वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 23:45 IST2018-10-05T23:45:16+5:302018-10-05T23:45:42+5:30
तिकीट चोरी प्रकरणातील वाहकांना निलंबित न करता तडजोड करून पुन्हा संधी द्यायची. तीन वेळा माफ करायचे. मात्र चौथ्या वेळेस निलंबन करायचे. ही कारवाई करताना पुन्हा कामावर आलेले कर्मचारी व्यवस्थित काम करतात का याचा आढावा घेतला जात आहे.

तिकीट चोरीतील संशयित ४४३ वाहकांवर वॉच
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तिकीट चोरी प्रकरणातील वाहकांना निलंबित न करता तडजोड करून पुन्हा संधी द्यायची. तीन वेळा माफ करायचे. मात्र चौथ्या वेळेस निलंबन करायचे. ही कारवाई करताना पुन्हा कामावर आलेले कर्मचारी व्यवस्थित काम करतात का याचा आढावा घेतला जात आहे. त्यांच्यावर वॉच ठेवण्याचे आदेश वरिष्ठ कार्यालयातून आले आहे. जिल्ह्यात असे ४४३ वाहक आहेत. त्यांनी तडजोडीतून ७९ लाख भरले. यानंतरही काही महाभाग पुन्हा तिकट चोरी करताना पकडले गेले आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाचे मनुष्यबळ पूर्ण क्षमतेने कामी लावण्यासाठी तडजोडीची मुभा दिली होती. अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे मनुष्यबळ वाढले आहे. त्यांच्याकडून दंडाच्या रूपात ३०० ते ५०० पट रक्कम वसूल करण्यात आली आहे.
यातील अनेक कर्मचाºयांनी तिकीट चोरीचा प्रकार थांबविला आहे. ते प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. तर काही वाहक मात्र चोरी सापडून दंड भरल्यानंतरही पुन्हा तिकीट चोरीत सापडले आहे. यामुळे परिवहन महामंडळाने अशा कर्मचाºयांवर लक्ष केंद्रित केले आहे. ते ज्या रूटवर वाहन चालवितात, त्याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे तिकीट चोरीला आळा बसणार आहे.
१५० प्रकरणात ३० लाखांचा दंड
तिकीट चोरीतील काही प्रकरणात दोन, तीन, चार लाख रूपयांपर्यंतचा दंड आहे. अशा प्रकरणात १५० आरोपींनी अजूनही महामंडळाकडे ३० लाखांची रक्कम भरली नाही. या प्रकरणात आता न्यायालयीन लढाई सुरू आहे.