शेतकर्यांना सोडले वार्यावर
By Admin | Updated: May 29, 2014 02:57 IST2014-05-29T02:57:30+5:302014-05-29T02:57:30+5:30
खरीप हंगाम तोंडावर आलाय. शेतकर्यांच्या शिवारात मशागतीची कामे सुरू आहेत.

शेतकर्यांना सोडले वार्यावर
यवतमाळ : खरीप हंगाम तोंडावर आलाय. शेतकर्यांच्या शिवारात मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र सोयाबीनसह कापसाच्या बियाण्यांचे वाढलेले भाव यामुळे बियाणे खरेदीसाठी शेतकर्यांची आर्थिक दमछाक सुरू आहे. अतवृष्टी आणि गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना यातून कसा मार्ग काढावा हे समजेनासे झाले आहे. आता शेतकर्यांना नाईलाजाने सावकाराच्या दारात धाव घ्यावी लागत आहे. जिल्ह्यात यंदा दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. खरीप आणि रबी हंगाम पुरता हातातून गेला आहे. नुकसानीच्या तुलनेत पाहिजे त्या प्रमाणात शासनाकडून मदत झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. पिकविमासुध्दा मिळण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. नापिकीमुळे कर्ज फेडण्याची सोय नाही. बँका कर्जाचे पुनर्गठण करायला तयार नाही. अखेरचा पर्याय म्हणून आता सावकाराकडून कर्ज घेणे भाग पडत आहे. जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकर्यांनी बियाण्यांची तजविज करण्यासाठी आपली शेतजमीन सावकाराकडे गहाण ठेवणे सुरू केले आहे. सावकारसुध्दा अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारत आहे. ग्रामीण भागात शेती कसणे कठीण होवून बसले आहे. मजुरांची वाढती टंचाई, बी- बियाणे व खते यांचे गगनाला भिडलेले भाव यामुळे शेतीव्यवस्था एका दुष्टचक्रात सापडली आहे. पैशाअभावी अनेकांनी आपली शेती मक्त्याने देणे सुरू केले आहे. कोरडवाहू व बागायती शेतकर्यांची स्थिती जवळपास सारखीच आहे. कृषी विभागाच्या विविध योजना असतांना या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंंंत पोहोचविण्यात कृ षी विभागाला पाहिजे तसा इंटरेस्ट असल्याचे दिसून येत नाही. आपल्या मर्जीतील लोकांना योजनांचा लाभ देण्यात येतो. कृषी विभागाच्या अभ्यासदौर्यात मर्जीतील कार्यकर्त्यांंंचा भरणा केला जातो. विशेष म्हणजे राज्य व राज्याच्या बाहेर शेतकर्यांना अभ्यास दौर्यानिमित्त नेण्यात आले होते. मात्र या अभ्यास दौर्याचे काय फलित, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही खास शेतकर्यांना विदेशातही अभ्यासासाठी नेण्यात आले होते. शेतीमध्ये कष्ट न करणारे व राजकीय शेती करणार्या कार्यकर्त्यांंंना ही सहल घडवून आणण्यात आली होती. कोरडवाहू शेतकर्यांना आधार देण्यासाठी शेततळ्यासारखी योजना प्रभावीपणे राबविणे गरजेचे असतांना याकडे कृषीविभागाने पाहिजे तसे लक्ष दिले नाही. ज्या शेतकर्यांच्या शेतात शेततळी खोदण्यात आली तेथील शेततळी दुसर्याच वर्षी बुजविण्यात आली. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात कृषी क्षेत्राची पडझड होत आहे. नागपूर येथे भव्य कृषी प्रदर्शन भरले होते. केवळ कृषी प्रदर्शनाची वारी घडवून आणण्यापलीकडे कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी फारसे कष्ट घेतले नाही.लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी विभागाला योजना शेतकर्यांपर्यंंंत पोहोचविण्याची सक्त ताकीद दिली आहे. मात्र कृषी विभागाची झोप अजूनही उडाल्याचे दिसत नाही. एकंदरीत शेतकर्यांच्या समग्र विकासासाठी असलेला कृषी विभाग मात्र शेतकर्यांना वार्यावर सोडण्यात यशस्वी झाला आहे. (शहर प्रतिनिधी)