वडगाव रोड बेसावध, एलसीबीने मारला हात
By Admin | Updated: June 2, 2017 01:41 IST2017-06-02T01:41:27+5:302017-06-02T01:41:27+5:30
गुन्ह्यांचे डिटेक्शन व आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. खुनातील गुन्ह्यात साहेबांनी मूळ टीप मिळविणाऱ्या पोलीस...

वडगाव रोड बेसावध, एलसीबीने मारला हात
साहेबांच्या आदेशात गुरफटल्याचा फटका : डिटेक्शनसाठी रस्सीखेच
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुन्ह्यांचे डिटेक्शन व आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. खुनातील गुन्ह्यात साहेबांनी मूळ टीप मिळविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गुंतवून ठेवल्याची संधी साधून स्थानिक गुन्हे शाखेनेच त्या आरोपीला अटक करून डिटेक्शनवर हात मारला. या बेसावधगिरीमुळे चिडलेल्या पोलिसांनी मग मेहनत आमची आणि तू भलत्याच्याच हाती का लागला म्हणून आरोपीलाच बाजीराव दाखविला जातो.
स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव रोड पोलिसांमधील डिटेक्शनच्या स्पर्धेचे हे प्रकरण गुरुवारी पुढे आले. अप्रत्यक्ष एलसीबीची मदत करून साहेबांनी आपल्याच कार्यक्षेत्रात होऊ घातलेल्या कामगिरीवर पाणी फिरविल्याचे बोलले जाते.
यवतमाळात शहर पोलीस ठाणे, वडगाव रोड, लोहारा आणि ग्रामीण पोलीस ठाणे, असे चार ठाणे आहेत. त्यांचे स्वतंत्र शोध पथक आहे. शिवाय उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त पथकातील कर्मचारीसुद्धा याच वर्तुळात काम करतात. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचेही तीन पथक आहे. टोळीविरोधी पथक तर संपूर्णपणे शहरातील गुन्ह्यांवरच लक्ष केंद्रीत करून आहे. स्थानिक गुन्हे शाखेशी संलग्नीत काही कर्मचारीही तपासावर काम करतात. त्यामुळे एकाच वर्तुळात अनेक शोध पथकांची गर्दी झाली आहे.
एखादा गुन्हा घडला, की सर्व पथकातील एक अधिकारी व कर्मचारी सायबर सेलमध्ये ठाण मांडून बसतो. माहितगार कर्मचारी बाहेर फिरून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करतात. सायबर शाखेतून क्ल्यू मिळाला, की लगेच संपूर्ण यंत्रणा लोकेशनवर कामाला लागते. त्यामुळे गुन्हा तपासाची पद्धत सर्वांचीच सारखी झाली. यातूनच गुन्हा उघडकीस आणण्याची स्पर्धा रंगत आहे. ठाण्यातील शोध पथकांना तातडीने हालचाली करण्यासाठी साधन-सामुग्रीच्या मर्यादा येतात. त्या तुलनेत स्थानिक गुन्हे शाखेतील पथकांकडे पुरेसा वेळ असतो. त्यामुळे अनेक गुन्ह्यांमध्ये सुगावा लागूनही निर्णायक अटकेची कारवाई पोलीस ठाण्यातील शोध पथकाना करता येत नाही. परिणामी बरेचदा त्यांच्या तोंडचा घास हिरावल्याचे दु:ख कर्मचाऱ्यांना सोसावे लागते. हाच गुन्हेगार एलसीबीकडून पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला जातो. यामुळे त्या ठाण्यातील कर्मचारी त्याला बाजीराव दाखवितात.