भीषण अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:08+5:30
रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्ताना मदत मिळण्यास विलंब झाला. जखमी गाडीच्या काचा फोडून बाहेर निघाले. मात्र उर्वरित दोघांना मदत न मिळाल्यामुळे त्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. सकाळी ५ वाजता पांढरकवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना आदिलाबाद येथे रवाना केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणबोरी : नागपूरहून हैदराबादकडे सुसाट वेगाने निघालेल्या जॅग्वार गाडीला पिंपळखुटीनजीक राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊन त्यात दोनजण जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास पिंपळखुटी रेल्वे पुलाजवळ घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून रस्त्याच्या बाजुला २० फूट खोल असलेल्या शेतात फेकले गेले.
योगेश गुप्ता (३७) रा.चप्पलबाजार हैद्राबाद (तेलंगणा), पटाली किशोरकुमार क्रिष्णाचार्य (३६) रा.चारमिनार, सिटीकॉलेजजवळ हैद्राबाद अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये चालक विकास अग्रवाल (४०) व योगेश अग्रवाल (३५) दोघेही रा.हैद्राबाद यांचा समावेश आहे. हे सर्वजण नागपुरहून (टी.एस.१२-इ.सी.९७१९) क्रमांकाच्या जॅग्वार कारने हैद्राबादकडे जात होते. दरम्यान, पिंपळखुटीजवळ असलेल्या एका खड्ड्यात वाहन आदळल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व ही कार ५०० मीटर दूर रस्त्याच्या बाजुला जाऊन आदळली. चालक व त्याच्या बाजुला बसलेला युवक सीटबेल्ट लावून असल्यामुळे त्यांना किरकोळ मार लागला. मात्र मागील सीटवर बसून असलेल्या योगेश गुप्ता व पटाली क्रिष्णाचार्य या दोघांचाही मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने अपघातग्रस्ताना मदत मिळण्यास विलंब झाला. जखमी गाडीच्या काचा फोडून बाहेर निघाले. मात्र उर्वरित दोघांना मदत न मिळाल्यामुळे त्यांचा तडफडून जागीच मृत्यू झाला. सकाळी ५ वाजता पांढरकवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना आदिलाबाद येथे रवाना केले. एपीआय विनोद झळके, जमादार रंगलाल पवार, क्षीरसागर, चव्हाण, उघडे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. राष्ट्रीय महामार्गावर अजुनही काही ठिकाणचे काम बाकी असून येथील केवळ २० फुटाचे काम बाकी आहे. या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत असूनही राजपथ कंपनी सदर रस्त्याचे काम का करित नाही, असा सवाल पिंपळखुटीवासींयानी उपस्थित केला आहे. दरम्यान, गुरूवारी सकाळी संतप्त गावकऱ्यांनी काही काळ रस्ता रोखून ठेवला होता. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.