निम्म्याच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीचा निधी वळता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 05:00 IST2020-11-14T05:00:00+5:302020-11-14T05:00:11+5:30
दिवाळीपूर्वी ही मदत बॅंक खात्यात जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ४९ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे. या पैकी २१ हजार ५६९ शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारी ही मदत वळती करण्यात आली. यातील निम्मे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

निम्म्याच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीचा निधी वळता
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जून ते ऑक्टोबर महिन्यात बरसलेल्या अतिपावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. चार लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात नुकसान झाले असले तरी शासनाच्या प्राथमिक अहवालात ३४ हजार ८०८ हेक्टरवरील क्षेत्र ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसानग्रस्त असल्याची नोंद आहे. यामुळे राज्य शासनाने जिल्ह्याला त्यानुसार हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत वळती केली आहे.
दिवाळीपूर्वी ही मदत बॅंक खात्यात जमा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ४९ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले आहे. या पैकी २१ हजार ५६९ शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारी ही मदत वळती करण्यात आली. यातील निम्मे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे कही खुशी कही गम असे चित्र गावात आहे.
केवळ २७५ गावांनाच मिळणार मदत
जून ते सप्टेंबरमध्ये २१२ गावांमध्ये ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले. तर ६१ गावांमध्ये ऑक्टोबर महिन्यात ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस बरसला. निकषानुसार दोन हजार ३९ गावांपैकी २७५ गाव मदतीला पात्र ठरले. तर १७६४ गाव अजूनही मदतीच्या निकषाबाहेर आहे. या संदर्भात पालकमंत्र्यांनी सुधारित प्रस्ताव पाठविला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात सर्वाधिक नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेली मदत दिलासा देणारी होती. ही मदत अद्यापही आमच्या खात्यामध्ये जमा झाली नाही.
- प्रेम मुराब, शेतकरी