अबब.. ५० लाखांचे हळकुंड, सोयाबीन महागावात बेवारस आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 14:17 IST2021-11-17T14:12:56+5:302021-11-17T14:17:26+5:30
येथील अनुसूचित जाती-जमाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेजवळ सोयाबीन भरलेले ७०० पोते व हळकुंड भरलेले ४०० पोते बेवारस स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

अबब.. ५० लाखांचे हळकुंड, सोयाबीन महागावात बेवारस आढळले
यवतमाळ : येथील अनुसूचित जाती-जमाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेजवळ सोयाबीन भरलेले ७०० पोते व हळकुंड भरलेले ४०० पोते बेवारस स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मालाची किमत ५० कोटी पेक्षा जास्त आहे. घटना उघडकीस येवून १८ तास लोटले तरी या शेतमालावर मालकी हक्क सांगणारे कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
दरम्यान नांदेड तालुक्यातील हदगाव येथील वेअर हाऊसमधून या शेतमालाला पाय फुटल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. मरसूळ येथील एका मास्टर माईंडचा या प्रकरणाशी संबंध असल्याचेही बोलले जात आहे.
सोमवारी दुपारी २ वाजताच्या लालरंगाच्या दोन ट्रकमधून सोयाबीन आणि हळद महागावात आली. निवासी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत हा माल हमालांच्या मदतीने खाली करून गंजी लावण्यात आली. ती गंजी ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतमाल बेवारस स्थितीत साठवल्याने विविध चर्चेला पेव फुटले आहे. सोमवारी रात्री ११ वाजता ठाणेदार विलास चव्हाण, पीएसआय उमेश भोसले यांनी घटनास्थळ गाठले. उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनीही भेट देवून पाहणी केली.
पोलिसांनी रात्रभर या ठिकाणी पहारा लावला. बेवारस शेतमालाचा पंचनामा करून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, हदगाव येथील ठाणेदार विजय डोंगरे यांच्याशी ‘लोकमत’ने भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता येथील खासगी वेअर हाऊसमधून शेतमालाची अफरातफर झाल्याची चर्चा कानावर आली. मात्र इथेही तक्रार देण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल केलेला नाही. शेतमाल तारण ठेवणारी बॅंक किंवा व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही, तोपर्यंत कारवाई करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. महागाव बाजार समितीची यंत्रणा देखील बेवारस शेतमालाजवळ पोहोचली असून या प्रकरणात नेमके कोणते रहस्य पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बेवारस सोयाबीन, हळकुंड आम्ही ताब्यात घेतले. अद्याप या मालावर मालकी हक्क सांगणारा कुणीच पुढे आला नाही. ज्यांचा हा माल असेल त्यांनी पुढे यावे, आम्ही त्यांना माल सुपूर्द करू. त्यांना ठोस पुरावा सादर करावा लागेल. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल केला नाही. मात्र तपास सुरू आहे.
- विलास चव्हाण, ठाणेदार, महागाव.