टोमॅटोची श्रीमंती आहे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 05:00 AM2021-11-27T05:00:00+5:302021-11-27T05:00:25+5:30
पूर्वी ६० ते ८० रुपये किलोच्या घरात असणारे सफरचंद आता १५० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. तर टोमॅटोचे दर जैथे थे ६० ते ८० रुपये किलोच्या घरात आहे. इतर भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. यामुळे गृहिणींना थोडासा दिलासा मिळाला आहे; मात्र फळाच्या किमती वाढल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड पडला आहे. तर दुसरीकडे फळ विक्रेत्या व्यापाऱ्यांना दिवसभराची मजुरीही मिळत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भाजीपाल्याच्या दरामध्ये सतत चढ-उतार होत आहे. अलीकडे टोमॅटोचे दर कायम वाढलेल्या स्वरुपात आहेत; मात्र फळाचे दर त्यापेक्षाही दुपटीने वाढून आहे. हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीने सफरचंदाचे मोठे नुकसान झाले आहे. यातून सफरचंदाचे दर दुपटीने वाढले आहेत.
पूर्वी ६० ते ८० रुपये किलोच्या घरात असणारे सफरचंद आता १५० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. तर टोमॅटोचे दर जैथे थे ६० ते ८० रुपये किलोच्या घरात आहे. इतर भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. यामुळे गृहिणींना थोडासा दिलासा मिळाला आहे; मात्र फळाच्या किमती वाढल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड पडला आहे. तर दुसरीकडे फळ विक्रेत्या व्यापाऱ्यांना दिवसभराची मजुरीही मिळत नाही.
स्वयंपाक घरातून टोमॅटो गायब
पूर्वीपेक्षा भाजीपाला स्वस्त झाला आहे. याचा फायदा थोड्या प्रमाणात बजेट सुधारण्यास झाला आहे. मात्र टोमॅटोचे दर अजूनही खाली आले नाही. यामुळे स्वयंपाकगृहात टोमॅटो दिसतच नाही. त्याची जागा इतर भाज्यांनी घेतली आहे.
- सोनू मेश्राम, गृहिणी
मी भाजीपाला नाही तर फळाचा व्यापार करते. दिवसभरात एक कॅरेट फळही विकले जात नाही. आता कोरोनामुळे हा फरक पडला की थंडीमुळे हे समजण्यास मार्ग नाही. दोन पैसे उरायचे तर सोडूनच द्या. पोट भरणेही मुश्कील आहे.
- प्रीती बागडे, व्यापारी
दरवर्षी दरामध्ये चढ-उतार
शेतमालाचे दर दरवर्षी खाली-वर होत असतात. यावर्षी मात्र त्याचे गणितच उमगले नाही. ही परिस्थिती नवीन शेतमाल येईपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहे.
- राजू वासेकर, व्यापारी
मध्यप्रदेशातून यवतमाळमध्ये भाजीपाला येत आहे. स्थानिक भाजीपालाही सुरू झाला आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे.
- गजानन शिंदे, व्यापारी
का वाढले दर
- अतिपावसाने खरिपातील भाजीपाला नष्ट झाला. त्यानंतर सुयोग्य वातावरण मिळालेच नाही.
- भाजीपाल्याच्या पिकाची नासाडी झाली. यामुळे दरवाढ झाली.