वाघाच्या दहशतीने शेतीकामे थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:00 IST2018-02-01T22:00:11+5:302018-02-01T22:00:32+5:30

वाघाच्या दहशतीने शेतीकामे थांबली
ऑनलाईन लोकमत
मोहदा : वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतीकामे थांबली आहे. कामेच नसल्याने मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील उभी पिके काढण्याचा प्रश्न असल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी परिसरात मागील पाच महिन्यांपासून वनविभागाचे पथक तैनात होते. मात्र या पथकाला यश आलेले नाही. परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधीही हा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
राळेगाव, पांढरकवडा तालुक्यात येत असलेल्या वनक्षेत्रात वाघाचे १२ बळी ठरले आहेत. शेतकरी, शेतमजूर, गुराखी यांचा फडशा पाडला आहे. दोन दिवसांपूर्वी राळेगाव तालुक्याच्या लोणी येथील शेतकºयाचा बळी या वाघाने घेतला. आठवडा-पंधरा दिवसात वाघबळी ठरत असतानाही बंदोबस्त मात्र होत नाही. दरम्यानच्या काळात वनविभागातील अधिकारी, कर्मचारी अशा जवळपास ३०० जणांचा ताफा या परिसरात होता. शूटर, स्निपर डॉग, ड्रोन, नाईट व्हिजन कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे सज्ज होते. ६०० मीटर जाळीही लावण्यात आली होती. शेळी, म्हशीचे बछडे वाघाचे भक्ष्य म्हणून जंगलात सोडले होते. या सर्व उपाययोजना फेल ठरल्या.
शेतकरी, शेतमजूर अडचणीत आलेले असताना परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी, मंत्री यांचे दुर्लक्ष सुरू आहे. मदतीच्या वितरणापुरती त्यांची हजेरी दिसत आहे. उपाययोजना गांभीर्याने राबविण्यासाठी त्यांच्याकडून कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही. मागील दोन वर्षांपासून वाघाच्या दहशतीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. गरजा भागविणे शेतकरी, शेतमजुरांना कठीण झाले आहे. आता तरी कठोर उपाययोजना व्हाव्या, अशी नागरिकांची मागणी आहे.