परप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी, खोकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:18+5:30
रेल्वे, बस आणि खासगी वाहन या माध्यमातून दररोज नागरिकांचे लोंढे परतत आहेत. कुठला व्यक्ती कुठल्या गावावरून परतला याची माहिती तत्काळ मिळावी म्हणून गाव पातळीवर गाव समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती दररोज येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेत आहे. गत २८ दिवसात जिल्ह्यात ५७ हजार ४८६ नागरिक परतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाच्या नियंत्रणासाठी २ मेपासून गावस्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार परजिल्हा आणि परप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी, खोकला असल्याची नोंद केली आहे.
रेल्वे, बस आणि खासगी वाहन या माध्यमातून दररोज नागरिकांचे लोंढे परतत आहेत. कुठला व्यक्ती कुठल्या गावावरून परतला याची माहिती तत्काळ मिळावी म्हणून गाव पातळीवर गाव समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती दररोज येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेत आहे. गत २८ दिवसात जिल्ह्यात ५७ हजार ४८६ नागरिक परतले आहे. या नागरिकांना सर्दी, खोकला किंवा इतर आजार आहे का याची पाहणी ही समिती करीत आहे. समितीच्या अहवालानुसार जिल्ह्यात तीन हजार २८० नागरिकांना सर्दी आणि खोकला असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. हा संपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात २० हजार ३४५ नागरिक होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
बाहेर जायचे असेल तर परवानगी लागेल
परजिल्हा, परराज्य या ठिकाणावरून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन कालवधीत कुठेही बाहेर जात येत नाही. तीव्र लक्षणे दिसल्यास तालुका समितीकडे या रुग्णांना वर्ग करण्याच्या सूचना आहे. याशिवाय क्वारंटाईन प्रक्रियेतील बाहेर पडलेल्या व्यक्तीला बाहेर जायचे असेल तर तशी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.