‘मास्क’साठी तीन यंत्रणा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST2022-01-07T05:00:00+5:302022-01-07T05:00:36+5:30
जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ५०वर पोहोचली आहे. संसर्ग वाढत असताना प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक जबाबदारी म्हणून सुरक्षा साधनांचा वापर करणे अपेक्षित आहे. तसे आवाहनही विविध स्तरावरून केले जाते. मात्र, कारवाई केल्याशिवाय जुमानणार नाही, अशीच स्थिती आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशावरून थेट कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

‘मास्क’साठी तीन यंत्रणा रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट धडकली आहे. महानगरांमध्ये हजारोंच्या संख्येत रुग्ण सापडत आहेत. यवतमाळ शहर व जिल्ह्यातही रुग्ण वाढत आहेत. असे असले तरी सुरक्षा नियमांचे पालन केले जात नाही. गर्दीत वावरणे, मास्कचा वापर न करणे सुरूच आहे. पुन्हा कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल, पोलीस व नगर परिषदेची यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. यवतमाळमधील मुख्य बाजारपेठेत गुरुवारी मास्क नसलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ५०वर पोहोचली आहे. संसर्ग वाढत असताना प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक जबाबदारी म्हणून सुरक्षा साधनांचा वापर करणे अपेक्षित आहे. तसे आवाहनही विविध स्तरावरून केले जाते. मात्र, कारवाई केल्याशिवाय जुमानणार नाही, अशीच स्थिती आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशावरून थेट कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
यवतमाळ शहरात उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, शहर ठाणेदार नंदकुमार पंत, अवधूतवाडी ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह तीनही विभागांचे कर्मचारी रस्त्यांवर फिरत होते. विनामास्क दिसणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये दंडाची पावती दिली जात होती. व्यावसायिकांनाही दुकाने उघडी ठेवण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना मास्कची सक्ती करा, त्याशिवाय वस्तू देऊ नका, अशी ताकीद देण्यात आली. दुकानात गर्दी झाल्यास व मास्क न दिसल्यास थेट दुकानदारावरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर राखणे व लसीकरण या चतु:सूत्रीचा प्रत्येकाने अवलंब करणे गरजेचे आहे. काही लक्षणे वाटल्यास तत्काळ कोरोनाची तपासणी करावी, जेणेकरून कुटुंबासह इतरांना संसर्गापासून दूर ठेवता येईल.
अडीच तासात ११००० दंड वसूल
मास्क न लावता शहरात फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गुरुवारी ११.३० वाजता ही मोहीम सुरू झाली. दुपारी २ वाजेपर्यंत २२ जणांकडून ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आता ही मोहीम नियमित राबविली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कठोर उपाययोजना राबविण्याच्या तयारीत आहे.