पैनगंगा नदी पुलाने घेतले आणखी तीन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:10 IST2017-08-25T22:10:24+5:302017-08-25T22:10:41+5:30
विशाल पात्र असलेल्या पैनगंगेच्या पुलावर सुरक्षा कठड्यांच्या अभावी शुक्रवारी पती-पत्नीसह तिघांचा बळी गेला. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर लोखंडी कठडे लावण्याची मागणी....

पैनगंगा नदी पुलाने घेतले आणखी तीन बळी
अविनाश खंदारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : विशाल पात्र असलेल्या पैनगंगेच्या पुलावर सुरक्षा कठड्यांच्या अभावी शुक्रवारी पती-पत्नीसह तिघांचा बळी गेला. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलावर लोखंडी कठडे लावण्याची मागणी सामाजिक संघटनांसह पोलीस यंत्रणेनेही केली होती. परंतु संबंधित विभागाने दखल घेतली नाही. शुक्रवारी तिघांचे बळी गेले, यापूर्वी अनेकांची बळी सुरक्षा कठड्याअभावी गेलेत. भविष्यातही असे अपघात होण्याची भीती आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरुन पैनगंगा नदी वाहते. या दोन प्रदेशांना जोडणारा मार्लेगाव येथे मोठा पूल आहे. याच पुलावर शुक्रवारी एका ट्रकने कारला जबर धडक दिली. सुरक्षा कठडे नसल्याने कार थेट नदी पात्रात कोसळली. या भीषण अपघातात ज्ञानेश्वर गोटे, त्यांच्या पत्नी रत्ना गोटे आणि चालक जागीच ठार झाले. या पुलावर सुरक्षा कठडे असते तर अपघातानंतर कार कठड्याला अडकली असती आणि नदीपात्रात कोसळली नसती, असे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.
यापूर्वीही या पुलावरून पडून अनेकांना प्राण गमवावा लागला तर कित्येक जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे पुलाच्या सुरक्षा कठड्यांबाबत विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला. पोलिसांनीही पत्रव्यवहार करून सुरक्षा कठडे आवश्यक असल्याचे संबंधित विभागाला सांगितले. परंतु अद्यापपर्यंत कुणीही दखल घेतली नाही. विशेष म्हणजे पैनगंगेच्या या पुलासोबतच जिल्ह्यातील अनेक मोठ्या नद्यांवर असलेल्या पुलांवरही सुरक्षा कठड्यांचा अभाव आहे. बांधकाम विभागाने कठडे लावून लोकांच्या प्राणांचे रक्षण करावे, अशी मागणी आहे.
लोखंडी सुरक्षा कठड्यांवर चोरट्यांची नजर
जिल्ह्यातील बहुतांश मोठ्या नद्यांच्या पुलावर बांधकाम विभागाने सुरक्षा कठडे लावले होते. परंतु लोखंडी सुरक्षा कठडे चोरट्यांचे लक्ष ठरले आहे. वारंवार कठडे लावल्यानंतरही चोरटे लोखंंडी पाईप चोरुन नेतात. त्यामुळे बांधकाम विभाग सुरक्षा कठडे लावण्याकडे दुर्लक्ष करते. परंतु अशा पुलांवर सिमेंटचे कठडे उभारल्यास अपघात टाळता येऊ शकतात. परंतु एकदा पूल बांधला की, त्याकडे बांधकाम विभाग पुन्हा कधीही लक्ष देत नाही.