जलकुंभांच्या स्वच्छतेसाठी हजारो लिटर पाणी रस्त्यावर
By Admin | Updated: April 22, 2016 04:19 IST2016-04-22T04:19:47+5:302016-04-22T04:19:47+5:30
जलकुंभाच्या स्वच्छतेच्या नावावर हजारो लिटर पाणी गुरुवारी रस्त्यावर वाहत होते. एकीकडे पाच दिवसांपासून

जलकुंभांच्या स्वच्छतेसाठी हजारो लिटर पाणी रस्त्यावर
यवतमाळ : जलकुंभाच्या स्वच्छतेच्या नावावर हजारो लिटर पाणी गुरुवारी रस्त्यावर वाहत होते. एकीकडे पाच दिवसांपासून शहरात नळ नाही. तर दुसरीकडे रस्त्यावरून भर उन्हाळ्यात वाहणारी गंगा पाहून नागरिक जीवन प्राधिकरणाच्या नावे संताप व्यक्त करीत होते.
पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणाने गाठलेला तळ आणि चापडोह धरणातून नसलेली वितरण व्यवस्था यामुळे शहरावर सध्या तीव्र जलसंकट उभे ठाकले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पूर्वी दोन दिवसाआड येणारे नळ आता तीन दिवसाआड येतील असे प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु आता तीन दिवसाआडही नळ सोडले न गेल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या संदर्भात जीवन प्राधिकरणाच्या सबंधित अभियंत्यांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता शहराला सध्या शहराला दूषित, व पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी असल्यामुळे गोदणी मार्गावरील जीवन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयात असलेल्या दोन टाक्या स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. याच कारणामुळे शहराला पाचव्या दिवशीही पाणी मिळाले नाही, ही परिस्थिती कधीपर्यंत कायम राहील हे समजायला मार्ग नाही. जीवन प्राधिकरणाकडून नागरिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही, त्यामुळे चांगलाच गोंधळ उडत आहे. सबंधित उपअभियंत्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते ‘नॉट रिचेबल’ होते.
गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य कार्यालयातील टाक्या स्वच्छ करण्यात न आल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात गाठ साचला आहे. त्यातूनच दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे. यामध्ये थोडी खोलात जाऊन माहिती घेतली असता अमोलकचंद महाविद्यालयामागे असलेले प्राधिकरणाचे फिल्टर अनेक वर्षांपासून योग्यरित्या काम करीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाणी शुद्धीकरणच होत नसल्याने टाक्यांमध्ये अशुद्ध पाणी येते. (प्रतिनिधी)
नागरिकांत तीव्र संताप
४यवतमाळ शहरातील हिंदी हायस्कूल ते मार्इंदे चौक मार्गावर गुरुवारी सायंकाळी रस्त्यावरून हजारो लिटर पाणी वाहून जात होते. एकीकडे शहरात भीषण पाणीटंचाई आणि दुसरीकडे पाण्याचा अपव्यय यामुळे नागरिक प्राधिकरणाच्या नावे संताप व्यक्त करीत होते.