इकडे प्यायला पाणी नाही, तिकडे टाकी मात्र ओव्हर फ्लो; यवतमाळमधले दृष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 17:24 IST2020-05-16T17:19:39+5:302020-05-16T17:24:10+5:30
शहर आणि परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टाकीवरून मात्र शेकडो लिटर पाणी वाहून जात असल्याचे विसंगत चित्र शनिवारी सायंकाळी वाघापूर नाका येथे पाहायला मिळाले.

इकडे प्यायला पाणी नाही, तिकडे टाकी मात्र ओव्हर फ्लो; यवतमाळमधले दृष्य
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहर आणि परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या टाकीवरून मात्र शेकडो लिटर पाणी वाहून जात असल्याचे विसंगत चित्र शनिवारी सायंकाळी वाघापूर नाका येथे पाहायला मिळाले.
वाघापूर नाका येथे जीवन प्राधिकरणाची मोठी टाकी आहे. शनिवारी ही टाकी भरल्याने त्यावरून शेकडो लिटर पाणी वाहून गेले. प्राधिकरण यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा हा अपव्यय झाला. एकीकडे शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अनेक भागात पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. कुठे पाच दिवसाआड, तर कुठे आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सलग तिसरा उन्हाळा येवूनही भाजपच्या महत्त्वाकांक्षी बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणण्याच्या योजनेची पूर्तता होऊ शकलेली नाही.