मुलांशी बोला, त्यांना बोलते करा आणि बोलतच राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:54 IST2018-08-11T21:52:26+5:302018-08-11T21:54:45+5:30

शरीरात होणारे बदल, त्याबाबत मुला-मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची योग्य उत्तरे पालकांनी दिली पाहिजे. मुळात लैंगिकतेविषयी कोणताही प्रश्न विचारताना मुलांना भीती वाटू नये, याची काळजी पालकांनीच घेतली पाहिजे.

Talk to children, talk to them and keep talking | मुलांशी बोला, त्यांना बोलते करा आणि बोलतच राहा

मुलांशी बोला, त्यांना बोलते करा आणि बोलतच राहा

ठळक मुद्देइंद्रजित खांडेकर : ‘वायपीएस’मध्ये ‘मुलांमधील लैंगिक बदला’वर पालकांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शरीरात होणारे बदल, त्याबाबत मुला-मुलींच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची योग्य उत्तरे पालकांनी दिली पाहिजे. मुळात लैंगिकतेविषयी कोणताही प्रश्न विचारताना मुलांना भीती वाटू नये, याची काळजी पालकांनीच घेतली पाहिजे. त्यासाठी मुलांशी बोला, त्यांनाही बोलते करा आणि सतत बोलत राहा, असा गुरुमंत्री डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी दिला.
‘किशोरवयीन मुले, लैंगिक बदल आणि शारीरिक शिक्षण - पालकांची भूमिका’ या विषयावर शनिवारी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये (वायपीएस) कार्यशाळा पार पडली. त्यावेळी सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्समधील फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर मार्गदर्शक म्हणून बोलत होते. डॉ. खांडेकर यांनी मुलांच्या लैंगिक बदलबाबत विविध पुस्तके लिहिली आहेत. बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या तपासाबाबत त्यांनी मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. विशेष म्हणजे, भारतात सध्या अशा गुन्ह्यांच्या तपासाबाबत याच पुस्तिकेचा आधार घेतला जात आहे.
मुलांना कार दिली, चालवणे कोण शिकवणार?
आजचे जग हे माहितीने भरलेले आहे. चोहोबाजूंनी मुलांपर्यंत माहितीचा भडीमार होत आहे. त्यांच्या हाती इंटरनेट आहे. पण ते कसे वापरावे, त्यातून कोणती माहिती घेतली पाहिजे, ती कशी घेतली पाहिजे, हे मुलांना कोणीही शिकवत नाही. मुलांच्या हाती कार दिली, पण कार चालविणे शिकवलेच नाही, तर अपघात होणारच. म्हणूनच पोर्नोग्राफीसारख्या साईटवर बंदी घालणे हा पयार्य नाही. तर पोर्नोग्राफी कशी वाईट आहे, हे मुलांना पालकांनीच योग्य वयात, योग्य शब्दात समजावून सांगणे आवश्यक आहे, असे डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी स्पष्ट केले.
या गोष्टींची घ्या तातडीने नोंद
पाठलाग - मुलांकडून होणाºया पाठलागामुळे मुलींमध्ये निराशा वाढते. पाठलागाला कंटाळून महाराष्ट्रात ७ हजार १३२ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. याबाबत मुलांना योग्य मार्गदर्शन करा.
छळवणूक - मुला-मुलींचा शाळेत अनेकदा छळ होतो. बºयाचदा हा छळ मित्रांकडून, सिनिअर मुलांकडूनही होतो. त्यामुळे मुल शाळेत जाण्यास नकार देते. त्याची कारणे पालकांनी जाणून घेतली पाहिजे.
प्रेम तुटणे - आठवी, नववीतील मुला-मुलींमध्ये प्रेम तुटणे या कारणावरूनही निराशा वाढत आहे. याबाबत पालकांनी त्यांच्याशी मोकळा संवाद साधल्यास अनर्थ टळू शकतो.

Web Title: Talk to children, talk to them and keep talking