विषय समित्या निवडीचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:07+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राज्यातील सरकार स्थापनेसाठी तयार झालेली महाविकास आघाडी कायम ठेवावी, असे संकेत आहेत. आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये राजकीय घडामोडी वाढणार आहेत. विषय समित्यांची निवड होणार असल्याने महाविकास आघाडीचे समिकरण जुळून येते की स्थानिक पातळीवरचे हेवेदावे इतरांसोबत बसण्यासाठी बाध्य करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील दहा नगरपालिकांपैकी प्रमुख नगरपालिकांमधील विषय समित्यांची निवड ९ व १३ जानेवारीला होत आहे.

विषय समित्या निवडीचे राजकारण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राज्यातील सरकार स्थापनेसाठी तयार झालेली महाविकास आघाडी कायम ठेवावी, असे संकेत आहेत. आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये राजकीय घडामोडी वाढणार आहेत. विषय समित्यांची निवड होणार असल्याने महाविकास आघाडीचे समिकरण जुळून येते की स्थानिक पातळीवरचे हेवेदावे इतरांसोबत बसण्यासाठी बाध्य करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील दहा नगरपालिकांपैकी प्रमुख नगरपालिकांमधील विषय समित्यांची निवड ९ व १३ जानेवारीला होत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ नगरपालिकेत बहूमत भाजपकडे, नगराध्यक्ष शिवसेनेचा अशी स्थिती आहे. आता विषय समित्या निवड करताना महाविकास आघाडीच्या प्रयोगातून एखादी तरी समिती बळकावता यावी यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. वणी नगरपरिषदेचीही समिती निवड ९ जानेवारीला आहे. तेथे भाजपची एकहाती सत्ता असल्याने कुठलेच समिकरण तूर्त तरी चालणार नाही अशी स्थिती आहे. केवळ आमदार गटातून की नगराध्यक्षाच्या मर्जीतून अशा पद्धतीने समिती सभापती ठरण्याची चिन्हे आहे. अर्थात याचा निर्णय माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांच्या कोर्टात होणार आहे. या दोन प्रमुख नगरपालिकेनंतर १३ जानेवारीला पुसद, उमरखेड, आर्णी, घाटंजी, दिग्रस या नगरपरिषदांमध्ये विषय समिती सभापती निवड प्रक्रिया होणार आहे. भाजप विरूद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना असे बलाबल जुळवून अधिकाधिक समित्या व पदे हस्तगत करण्यासाठी प्रयत्न आहे. मात्र या महाविकास आघाडीतील गोटातच इच्छुकांची संख्या अधिक असल्यास याचा फायदा आपसुकच इतर पक्षांनाही मिळविता येणार आहे. स्थानिक मुद्यांवरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सुसंवाद नसल्याचेही दिसून येते. त्यामुळे समित्या निर्माण करताना वेट अँड वॉचची भूमिका घेऊन भाजप काम करत आहे. तर दुसरीकडे आपल्यातील वितुष्टामुळे इतरांचा फायदा होऊ नये ही खेळी रचली जात आहे. मजेशीर बाब म्हणजे ज्या पालिकेत संख्याबळ अधिक आहे अशा पक्षाविरोधात इतर सर्व असेच समिकरण बहुतांश ठिकाणी तयार झालेले दिसत आहे. आता यात कोणाची किती सरशी होते हे येणाऱ्या काळात दिसणारच आहे.
नेर, दारव्हा तिसºया टप्प्यात
दहा नगरपालिकांमधील विषय समित्यांचा कालावधी टप्प्या टप्प्याने संपुष्टात येत आहे. त्यामुळे निवड प्रक्रिया ही चार टप्प्यात घेतली जात आहे. पहिल्या टप्पा ९ जानेवारीला, दुसरा टप्पा १३ जानेवारीला, तिसरा टप्पा १६ जानेवारीला दारव्हा नगरपालिकेत, तर १७ जानेवारीला नेर नगरपालिकेत विषय समिती निवड होणार आहे. पांढरकवडा नगरपरिषदेतील विषय समिती सभापती निवडीची प्रक्रिया २३ जानेवारीला संभावित आहे. शेवटच्या दोन टप्प्यांबाबत अधिकृत कार्यक्रम आला नाही.