अनावश्यक फिरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST2020-06-19T05:00:00+5:302020-06-19T05:00:26+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणू शहरातून ग्रामीण भागाकडे आला आहे. यानंतरही नागरिकांना कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नाही. यामुळे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना ५०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांना २०० रूपयांचा दंड केला जाणार आहे.

अनावश्यक फिरणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. या सुमारास जिल्ह्यातील नागरिक मास्क न लावता फिरत आहे. मॉर्निंग वॉकच्या नावावर तरूण-तरूणी बिनधास्त फिरत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून अशा नागरिकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. प्रथम आढळले तर ५०० रूपये दंड आणि दुसऱ्यांदा आढळले तर थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोना विषाणू शहरातून ग्रामीण भागाकडे आला आहे. यानंतरही नागरिकांना कोरोनाचे कुठलेही गांभीर्य नाही. यामुळे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांना ५०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांना २०० रूपयांचा दंड केला जाणार आहे. त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या दुकानामध्ये सोशल डिस्टन्स न पाळल्यास या ठिकाणी दुकानदाराला दोन हजाराचा दंड आणि ग्राहकांना प्रत्येकी २०० रूपयाचा दंड आहे. दुकानदारांनी वस्तूंच्या किमतीचे फलक बाहेर न लावल्यास त्यांना दोन हजार रूपयांचा दंड केला जाणार आहे.
मॉर्निंग वॉकच्या आडून नियमभंग
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह गुरुवारी नेहरू स्टेडियमवर गेले. यावेळी त्यांना शहरातील युवक आणि युवती चेहºयाला मास्क न लावता बिनधास्त फिरताना दिसले. याशिवाय गप्पा करताना ही मंडळी आढळली. याचप्रमाणे वयोवृद्धही बाहेर फिरताना दिसले. जिल्हाधिकाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहेत. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना ब्रेक लागणार आहे. हा नियम मोडित काढणाऱ्यांना फौजदारीला सामोरे जावे लागणार आहे.
ग्रामीण भागात मास्कचा वापरच नाही
ग्रामीण भागात मास्क न लावता लोक फिरतात. ग्रामीण भागातही कोरोना शिरला आहे. त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दोनशेचा दंड करण्याचे आदेश आहेत.
नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळावे. मास्क वापरावे आणि अनावश्यक बाहेर जाणे टाळावे. तरच या आजारातून सुटका होईल.
- एम.डी.सिंह, जिल्हाधिकारी