शालेय स्रेहभोजनातून सामाजिक सलोख्याचे बीजारोपण
By Admin | Updated: February 4, 2016 02:27 IST2016-02-04T02:27:26+5:302016-02-04T02:27:26+5:30
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसापासून दूर जात आहे. सिमेंट काँक्रिटच्या जंगलातील माणसे आत्मकेंद्री तर गावगाड्यातील माणसे वेगवेगळ्या कारणांनी विभाजित झाली आहे.

शालेय स्रेहभोजनातून सामाजिक सलोख्याचे बीजारोपण
विवेक ठाकरे दारव्हा
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणसापासून दूर जात आहे. सिमेंट काँक्रिटच्या जंगलातील माणसे आत्मकेंद्री तर गावगाड्यातील माणसे वेगवेगळ्या कारणांनी विभाजित झाली आहे. अशा गावखेड्यात सामाजिक सलोखा पुन्हा जिवंत व्हावा म्हणून दारव्हा पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून स्रेहभोजनाचे कार्यक्रम शाळांमध्ये आयोजित करून सामाजिक सलोख्याचे बीजारोपण केले जात आहे. तालुक्यातील ८० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
दारव्हा पंचायत समितीअंतर्गत १३५ शाळा आहे. या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा विडा गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी आणि विस्तार अधिकारी विकास घाडगे यांनी घेतला आहे. ११ केंद्रप्रमुख, आठ विषयतज्ज्ञ आणि मुख्याध्यापक व शिक्षकांच्यासोबतच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गावकऱ्यांना यात सहभागी करून घेतले आहे. शाळांमध्ये दररोज विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारांतर्गत खिचडी दिली जाते. मात्र दारव्हा पंचायत समितीने आता मुलांसोबतच पालकांनाही यात सहभागी करून घेण्याचा निश्चिय केला. गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी मुख्याध्यापकांच्या बैठकीत स्रेहभोजन उपक्रमाची माहिती दिली. राजुरा येथील एक पालक यासाठी तयार झाला. शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना स्रेहभोजन दिले. ही माहिती इतर शाळांनाही मिळाली. त्यामुळे इतर शाळाही तयार झाल्या.
विद्यार्थ्यांना पुरणपोळी, दूध, तूप, सलाद, पुरी-भाजी, पुलाव, कढी, जिलेबी असे जेवण मिळू लागले. खिचडी जेवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत असे पंचपक्वान्न मिळू लागले. सुरुवातीला स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी या स्रेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु आता विविध दिवशीही लोकसहभागातून स्रेहभोजन कार्यक्रम केले जात आहे. आतापर्यंत राजुरा, जवळा, दहेली, रामगाव हरू, लोही, चिकणी यासह ८० शाळांमध्ये हा उपक्रम पार पडला.
मुलाचा वाढदिवस शाळेत
दारव्हा तालुक्यात स्रेहभोजन हा उपक्रम एका विद्यार्थ्याच्या वाढदिवसापासून सुरू झाला. मुख्याध्यापकाने राजुरा येथील पालकांना अशा उपक्रमाची माहिती दिली, तेव्हा तेथील एक पालक स्रेहभोजन देण्यास तयार झाला. त्याने आपल्या मुलाचा वाढदिवस शाळेत साजरा करून विद्यार्थी व पालकांना स्रेहभोजन दिले आणि तेथून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.