तस्करांना स्थानिकांचीच साथ
By Admin | Updated: September 27, 2014 01:05 IST2014-09-27T01:05:36+5:302014-09-27T01:05:36+5:30
पुसद वनविभागांतर्गत उघडकीस आलेल्या सागवान तस्करीत तेलंगणाच्या टोळीला स्थानिक चोरट्यांची साथ असल्याची माहिती पुढे आली आहे.

तस्करांना स्थानिकांचीच साथ
पुसद : पुसद वनविभागांतर्गत उघडकीस आलेल्या सागवान तस्करीत तेलंगणाच्या टोळीला स्थानिक चोरट्यांची साथ असल्याची माहिती पुढे आली आहे. जंगलाचा खडान्खडा माहीत असलेल्या या स्थानिकांच्या मदतीने लाखो रुपयांचा सागवान बिनबोभाट पैनगंगा पार पोहोचत आहे. वन विभागातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना हा प्रकार माहीत असला तरी कारवाईनंतर थातूरमातूर चौकशी करून स्थानिकांना सोडून दिले जाते. स्थानिकांची कसून चौकशी केली तर आपलेही बिंग फुटेल या भीतीतून त्यांची चौकशीच होत नसल्याची माहिती आहे.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर आणि पुसद वन विभागातील जंगलांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात जंगल तोड सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. अभयारण्यातील चिखली येथे वन अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक असतानाच दुसरीकडे सागवान तस्कर वृक्षांवर करवत चालवित होते. अशा स्थितीत या तस्करांचे मनोधौर्य किती वाढले असेल हेच लक्षात येते. तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील केशवपट्टनम येथील टोळी या भागात सक्रिय आहे. ही टोळी मोठ्या शिताफीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या स्थानिकांना हाताशी धरते. जंगलाची माहिती असलेली ही स्थानिक मंडळी अवघ्या काही वेळातच सागवानाची तोड करतात. त्यानंतर वाहनाद्वारे केशवपट्टनमची टोळी सागवान पैनगंगा पार करतात.
दोन दिवसांपूर्वी हिमायतनगरजवळील पुलावर तेलंगणातील संशयास्पद वाहन दिसले. उपवनसंरक्षकांनी वाहन थांबविताच मुख्य आरोपी व चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना वन कर्मचाऱ्यांनी पकडले. मात्र मुख्य सूत्रधार पसार झाला. मुख्य आरोपी चालक-मालक आणि कटाई करणारे मजूरही तेलंगणातील असल्याची माहिती आहे. सहा जणांना अटक करण्यात आली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी करणाऱ्यांना जंगलाची खडान्खडा माहिती असणाऱ्या स्थानिकांची साथ असावी, हे स्पष्ट होते. परंतु वन विभाग मात्र कधीही त्या दृष्टीने सागवान चोरांचा छडा लावत नाही. जुजबी चौकशी, गुन्ह्यांची नोंद करून प्रकरण निस्तारले जाते. या मागे कारणही तसेच असल्याची चर्चा आहे. स्थानिक सागवान चोरटे वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नावानिशी ओळखतात. त्यात चोरट्यांना ताब्यात घेतले आणि चौकशीदरम्यान आपलीच नावे सांगितली तर या भीतीतून स्थानिकांना वन अधिकारी व कर्मचारी हातच लावत नाही. उलट तेलंगणातील चोरट्यांची अशी भीती नसते. वारंवार चोऱ्या होत असताना केवळ थातूरमातूर चौकशी करून इतर माहिती दडवून ठेवली जाते. या सर्व प्रकारात स्थानिकांची कसून चौकशी केल्यास वनविभागातील घरभेदींचाही पत्ता पुढे येऊ शकतो. परंतु त्या दृष्टीने तपासच होताना दिसत नाही आणि तस्करांचे चांगलेच फावत आहे. (वार्ताहर)