नंदीग्राम एक्स्प्रेस वणीकरांचा कायमचा निरोप घेण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST2022-03-05T05:00:00+5:302022-03-05T05:00:21+5:30
नंदीग्राम एक्सप्रेस सद्य:स्थितीत बंद आहे. त्यामुळे मुंबई किंवा औरंगाबादला जाण्यासाठी प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस अदिलाबादपासून पुढे मुंबईपर्यंत सध्या प्रवासी वाहतूक करीत आहे. या भागातील प्रवाशांना अदिलाबादपर्यंत पोहोचविण्यासाठी मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासन करीत असल्याची माहिती मिळाली.

नंदीग्राम एक्स्प्रेस वणीकरांचा कायमचा निरोप घेण्याची चिन्हे
संतोष कुंडकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दोन वर्षांपासून बंद असलेली नंदीग्राम एक्सप्रेस वणीकरांचा कायमचा निरोप घेण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही वर्षात माजरी ते अदिलाबाद मार्गावर या रेल्वेला तोटा सहन करावा लागल्याने रेल्वे प्रशासन निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी रेल्वेची वणीमार्गे प्रवासी वाहतूक नव्हती. परंतु २२ मार्च २००७ रोजी नंदीग्राम एक्सप्रेसला वणी थांबा मिळाला. त्यामुळे वणी येथून अदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद व मुंबई येथे जाण्यासाठी प्रवाशांना सोयीस्कर झाले होते. वणी येथून अनेक प्रवासी या नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करीत होते. नागपूरहून निघणारी ही रेल्वे वर्धा, माजरी येथूनही प्रवासी घेऊन पुढे जात होती. कोरोना काळात ही रेल्वे बंद करण्यात आली. ती बंदच आहे.
मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली
नंदीग्राम एक्सप्रेस सद्य:स्थितीत बंद आहे. त्यामुळे मुंबई किंवा औरंगाबादला जाण्यासाठी प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस अदिलाबादपासून पुढे मुंबईपर्यंत सध्या प्रवासी वाहतूक करीत आहे. या भागातील प्रवाशांना अदिलाबादपर्यंत पोहोचविण्यासाठी मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासन करीत असल्याची माहिती मिळाली.
अधिकृत दुजाेरा नाही
नंदीग्राम एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद होणार, याबाबतची माहिती देण्यास आम्ही असमर्थ आहो. याबाबत आपण रेल्वेच्या पीआरओ कार्यालयाशी संपर्क साधावा. - शिवशंकर सिंग, स्टेशन मास्टर, वणी.
सर्वसामान्यांना बसतोय फटका
वणी येथून अदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद, मुंबई येथे जाण्यासाठी नंदीग्राम एक्सप्रेस ही रेल्वे सोयीची होती. माफक दरात या रेल्वेने प्रवास करता येत होता. मात्र आता ही रेल्वे बंद आहे.
प्रवासी म्हणतात...
व्यापाराच्या दृष्टीने मी वणी येथून नेहमीच नंदीग्राम एक्सप्रेसने अदिलाबाद किंवा नांदेड येथे जात होतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून ही रेल्वे बंद असल्याने ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे. यातून आर्थिक फटकाही बसत आहे. त्यामुळे वणी येथून रेल्वेसेवा अतिशय आवश्यक झाली आहे.
- पराग हनुमंते, प्रवासी.
नंदीग्राम एक्सप्रेस विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही अतिशय सोयीची होती. वणी येथील अनेक विद्यार्थी नांदेड, औरंगाबाद, मुंबई याठिकाणी शिक्षणासाठी जातात. आमच्या पाल्यांना संबंधित ठिकाणी पोहोचविण्यासाठी आम्हीही सोबत जात होतो. नंदीग्राम रेल्वे बंद असल्याने गैरसोय होत आहे.
- प्रभाकर डाखरे, प्रवासी.