‘शकुंतला’ दोन वर्षांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:16 IST2019-06-05T22:15:31+5:302019-06-05T22:16:05+5:30
शकुंतला रेल्वे सुरू न केल्यास नागरिकांसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे. गेली दोन वर्षांपासून ही रेल्वेसेवा बंद आहे.

‘शकुंतला’ दोन वर्षांपासून बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शकुंतला रेल्वे सुरू न केल्यास नागरिकांसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे. गेली दोन वर्षांपासून ही रेल्वेसेवा बंद आहे.
प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना शकुंतला रेल्वेचा चांगला आधार आहे. यवतमाळ-मूर्तीजापूर रेल्वे मार्गावर असलेल्या गावातील नागरिकांनी खासदार भावना गवळी यांची भेट घेऊन सदर रेल्वे सुरू करण्याची मागणी लाऊन धरली. रेल्वे बंद झाल्याने निर्माण झालेले प्रश्न त्यांच्याकडे मांडण्यात आले. खासदार गवळी यांनी तत्काळ रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून शकुंतला सुरू करण्याची मागणी केली. सोबतच रेल्वेच्या भुसावळ येथील अधिकाऱ्यांशी त्याचवेळी संवाद साधून नागरिकांच्या भावना कळविल्या. दरम्यान, शकुंतला रेल्वेचे लवकरच ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शकुंतला रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदारांना निवेदन देताना बंडू पाचखंडे, संतोष भोयर, छाया भगत, यशवंत दुधे, प्रवीण इंगोले, सचिन निमकर, ममता लढ्ढा, रेखा उके, रघुनाथ जाधव आदी उपस्थित होते.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. कळंबपर्यंत मातीकाम पूर्ण झाले. तेथून यवतमाळ मार्गावरील मातीकाम प्रगतिपथावर आहे. कळंब भागात लवकरच रेल्वे रूळ टाकण्यास प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील भूसंपादनाची जवळपास प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे खासदार भावना गवळी यांनी म्हटले आहे.