सर्जा-राजा माफ कर
By Admin | Updated: August 24, 2014 23:45 IST2014-08-24T23:45:43+5:302014-08-24T23:45:43+5:30
‘वर्षभर शेतात राब राब राबला. तुझ्या हक्काचा आणि सन्मानाचा दिवस आला. झुल, गोंडे, मटाटी, बेगड, बाशिंग घ्यायलाच काय साधा गेरु घ्यायलाही आज पैसे नाही. मात्र तुला पुरण-पोळीचा नैवेद्य

सर्जा-राजा माफ कर
कोरडा दुष्काळ : पावसाच्या दडीने करपणारी पिके पाहून हतबल शेतकरी म्हणतो...
ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ
‘वर्षभर शेतात राब राब राबला. तुझ्या हक्काचा आणि सन्मानाचा दिवस आला. झुल, गोंडे, मटाटी, बेगड, बाशिंग घ्यायलाच काय साधा गेरु घ्यायलाही आज पैसे नाही. मात्र तुला पुरण-पोळीचा नैवेद्य दाखवून तोरणाखाली तर न्यावेच लागेल. करपणारी पिके आणि उजाड माळरान पाहून मन उदास आहे. सर्जा-राजा माफ कर यंदा पोळ्यात तुला मनासारखे सजवताच येणार नाही’. यंदा अवतन घे आणि पुढच्यावर्षी मात्र निश्चितच तुला सजवितो, असा बळीराजा आपल्या लाडक्या सर्जा-राजाला म्हणत आहे. पोळ्याला बैलांना सजविण्याची लाख इच्छा असतानाही यंदा मात्र मुरड घालावी लागत आहे.
यवतमाळ : दुष्काळ, दुष्काळ आणि दुष्काळ शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ. यंदा कोरड्या दुष्काळाचे सर्वत्र सावट आहे. पावसाचा पत्ता नाही. उन्हाळ्यासारखी ऊन तापत आहे. परिश्रमाने उगविलेले पीकही उन्हाने करपत आहे. काय करावे, अशी चिंता लागलेली असतानाच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण आला. वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाच्या सन्मानाचा हा दिवस. कृषिप्रधान संस्कृतीतला सर्वात मोठा सण. तीन दिवसाच्या या सणाला सुरुवात होते, ती बैलाला आमंत्रण देण्याच्या खांद शेकणीपासून. वर्षभर ओझे वाहणारे बैलांचे खांदे या दिवशी लोणी लावून शेकले जातात. त्याला पोळ्याच्या जेवणाचे आमंत्रण दिले जाते. दुसऱ्या दिवशी मुलांसारखे सजवून पोळ्याच्या तोरणाखाली उभे केले जाते. त्या दिवशी शेतकऱ्यांच्या घरची लगबग पाहण्यासारखी असते. सजविलेल्या बैलाला तोरणाखाली पाहून ऊर अभिमानने भरून येतो.
वर्षभर राबणारा त्याचा सखा झूल पांघरुन, रंगीबेरंगी गोंडे लावून पोळ्याच्या तोरणात दिसतो, त्यावेळेस शेतकऱ्याला आपल्या श्रमाचे चिज झाल्याचे वाटते. सर्व दु:ख विसरुन पोळा साजरा करतो. दुसऱ्या दिवशी तान्हा पोळाही तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो. हातात मातीचे बैल घेऊन येणाऱ्या चिमुकल्यांना भरभरून देतो. या बैलांची मनोभावे पूजा करतो. मात्र यंदाच्या पोळ्याला दु:ख विसरण्यालायक स्थिती नाही.
नदी-नाले अद्यापही कोरडे आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना मनसोक्त आंघोळ कोठे घालावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. उडीद, मुगाची पेरणीच झाली नाही. याच पिकांवर शेतकरी पोळा साजरा करीत आला आहे. मात्र यंदा तेही हाती नाही. त्यामुळे पोळा सण उधार-उसनवार करून साजरा करण्याची वेळ आली. रविवारच्या आठवडी बाजारात दुष्काळाचे स्पष्ट दिसत होते. शेतकरी बाजारात दिसत होते.
डोळे भरून सजावटीचे साहित्य पाहत होते. मात्र खिशाचा सल्ला घेता सजावटी साहित्य खरेदी करण्याची हिंमतच होत नव्हती. वर्षभर राबणारा सर्जा-राजा कसा सजवावा, हीच खरी त्याची विवंचना होती. यंदाच्या पोळ्यात वर्षभर कुठलीही कुरबुर न करता राबणाऱ्या सर्जा-राजाच्या ऋणातून उतराई होण्यापासून निसर्गाने शेतकऱ्याला वंचित ठेवले.