पुसद तालुक्यात १६ गावांमधील शेताच्या बांधावर पोहोचले बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:00:25+5:30
बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी कृषी सेवा केंद्रातून केल्यास गर्दी होऊ शकते. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे, खत पुरवठा थेट बांधावर केला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार इंद्रनील नाईक, आमदार अॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते करण्यात आला.

पुसद तालुक्यात १६ गावांमधील शेताच्या बांधावर पोहोचले बियाणे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर खते, बियाणे पुरविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. तीन आमदारांच्या उपस्थितीत बुधवारी १६ गावांत बियाणे व खते रवाना करण्यात आले.
बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी कृषी सेवा केंद्रातून केल्यास गर्दी होऊ शकते. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे, खत पुरवठा थेट बांधावर केला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार इंद्रनील नाईक, आमदार अॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ.पी.जी. नाईक, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर राठोड उपस्थिती होते.
शेतकरी गटामार्फत भाजीपाला व फळे यांचा १४ क्ंिवटल पुरवठा शहरामध्ये करण्यात आला. त्याच धर्तीवर गावपातळीवर बियाणे, खते पुरवठा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी आत्माअंतर्गत नोंदणीकृती गटाकडे किंवा तात्पुरता गट स्थापन करून त्यांची नावे, पत्ता, सर्व्हे नंबर, संपर्क क्रमांक, आधार क्रमांक, त्यांना ज्या कृषी केंद्रामार्फत निविष्ठा खरेदी करावयाच्या आहे, त्याचे नाव, आवश्यक निविष्ठांची नोंदणी कृषी विभागाद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर करता येणार आहे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने गटप्रमुखानेच निविष्ठांची उचल करावी. यामुळे सर्व शेतकऱ्यांना कृषी केंद्रात जावे लागणार नाही. एकत्रित खरेदीमुळे माल वाहतूक व हमालीचा खर्च वाचणार आहे.
१.२० टन बियाणे ५० मेट्रीक टन खत
लोकप्रतिनिधींनी या उपक्रमाचे कौतुक करून मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाच्या माध्यमातून पहिल्या दिवशी २१ वाहनांनी तालुक्यातील १६ गावात १.२० टन बियाणे आणि ५० मेट्रीक टन खत रवाना करण्यात आले. मंडळ कृषी अधिकारी बी.डी. चेके, नीलेश राठोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक एस.डी. मारे यांनी नियोजनाविषयक कामे पार पाडली. कृषी निविष्ठा विक्रेता संघाचे अध्यक्ष सुधीर पळसकर, सचिव नितेश शेजपाळ, कोषाध्यक्ष प्रविर व्यवहारे यांचे सहकार्य लाभले.