कळंब महसूल विभागाच्या हद्दीतून रेती तस्करी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:18+5:30
शहराच्या आजूबाजुला आणि वर्धा नदीकाठावरील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार महसूल विभागाला माहिती आहे. काहींनी सरकारी व मालकीच्या जमिनीत खोदकाम करून मुरुम काढणे सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : शहरातून मोठ्या प्रमाणात रेतीची ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे चक्क तहसील कार्यालयापासून रेतीसोबतच मुरुम व इतर गौण खनिजाची अवैध वाहतूक केली जात आहे. असे असताना एकाही वाहनांवर कारवाई होत नाही.
शहराच्या आजूबाजुला आणि वर्धा नदीकाठावरील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार महसूल विभागाला माहिती आहे. काहींनी सरकारी व मालकीच्या जमिनीत खोदकाम करून मुरुम काढणे सुरु केले आहे. नेमकी रॉयल्टी पास काढायची आणि हजारो ब्रास मुरुम खोदून वाहतुक करायचा हा धंदा सर्रास केला जात आहे. विशेष म्हणजे शासकीय सुटीच्या दिवशी या माफीयांनी उच्छांद मांडलेला असतो.
काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने केवळ सोपस्कार म्हणून एकाच ठिकाणी अवैधपणे साठवणूक केलेल्या साठेबाजाला सहा लाख १६ हजारांचा दंड ठोकला आहे. परंतु अजूनही दंडाची रक्कम भरलेली नाही. एवढेच नव्हे तर, दंड लावल्यानंतर संबधिताने कुठलाही प्रतिसाद न देता चक्क महसूल विभागालाच आव्हान देण्याचे काम केले.
नदीकाठावर राहात असलेला एक माफीया कुठलीही भीती न बाळगता रेतीची तस्करी करीत आहे. ‘अर्थपूर्ण’ संबधातून चक्क घराच्या आवारात रेती साठविली जात आहे. काही दिवसांपूर्वी थाळेगाव येथील एका शेतात रेतीच्या अवैध साठ्याचा अहवाल तलाठी राजेश चौधरी यांनी सादर केला होता. जमीन शेतकऱ्याची आणि रेती नदीकाठावर राहत असलेल्या एका रेती माफीयाची, असा हा प्रकार होता. कृषक असलेल्या या शेतातील रेतीसाठा खरे तर अवैधच होता. परंतु रेतीमाफीयाने ‘तोडपाणी’ करून हे प्रकरण मिटविले. त्यामुळे कुठलीही कारवाई केली नाही.