जलाशये अद्याप तहानलेलीच

By Admin | Updated: August 26, 2014 23:45 IST2014-08-26T23:45:34+5:302014-08-26T23:45:34+5:30

हवामान खात्याने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आज जिल्हयाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

The reservoirs are still thirsty | जलाशये अद्याप तहानलेलीच

जलाशये अद्याप तहानलेलीच

यवतमाळ : हवामान खात्याने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. आज जिल्हयाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही स्थिती दमदार पाऊस न आल्यास यापुढे आणखी भयावह होण्याची स्थिती आहे. पावसाचे तीन मुख्य महिने संपत आले. मात्र नदी पात्रात पूर आलाच नाही. परिणामी जलाशयात तोकडा पाणीसाठा शिल्लक राहला आहे. यामध्ये फारशी वाढ झाली नाही. परिणामी जिल्ह्याला भीषण टंचाईचा सामना करावा लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अल निनोच्या प्रभावाने यावर्षी सर्वात कमी पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. या इशाऱ्याला गांभीर्याने घेतले गेले नाही. आता पावसाचे तीन मुख्य महिने संपल्यानंतरही पाऊस बरसला नाही. यामुळे प्रशासन पाणीटंचाई निवारण्याच्या कामाला लागले आहे. युध्दपातळीवर पाणी टंचाई निवारण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी पाणी बचतीची तसदी घेतली असती तर पाणी टंचाई निवारण्यास खऱ्या अर्थाने सहकार्य लाभले असते.
जिल्ह्यातील सर्व मुख्य प्रकल्पात १२ ते ४० टक्के पाणी शिल्लक आहे. गतवर्षी यावेळी सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो अवस्थेत होते. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारा निळोणा प्रकल्प गतवर्षी आॅगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाला होता. काही दिवसांपूर्वी या प्रकल्पात ३८ टक्के जलसाठा होता. गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे हा जलसाठा ४८ टक्केच्या घरात पोहचला आहे. चापडोह प्रकल्पाची स्थिती जैसे थे अशीच आहे. या प्रकल्पात ४५.७७ टक्के पाणी शिल्लक राहले आहे. पुस प्रकल्पात २०.८१ टक्के जलसाठा आहे. तर अरूणावती प्रकल्पात कुठलीही वाढ नोंदविली गेली नाही. हा प्रकल्प १५.३८ टक्क्यावर स्थिर आहे. बेंबळा प्रकल्पाच्या जलसाठ्यात ५ टक्के वाढ झाली आहे. या ठिकाणी ३९.९२ टक्के पाणी शिल्लक आहे. सायखेड प्रकल्पाचा जलसाठा ४३ टक्क्यांवर पोहचला आहे. गोकी प्रकल्प क्षेत्रात १० टक्के वाढ झाली आहे. यामध्ये ४५ टक्के जलसाठा कायम आहे.
वाघाडी प्रकल्पात ३४ टक्के पाणी आहे. तर सर्वाधिक ७५ टक्के जलसाठा बोरगाव प्रकल्पात आहे. लोअर पुस प्रकल्पाच्या पात्रात ४९ टक्के जलसाठा आहे. अडाण प्रकल्पात केवळ १२ टक्के पाणी शिल्लक आहे. नवरगाव प्रकल्पात ३९.५० टक्के पाणी शिल्लक आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: The reservoirs are still thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.