भाडे ‘एसी’चे, प्रवास नॉन-एसीतून
By Admin | Updated: April 21, 2016 02:45 IST2016-04-21T02:45:16+5:302016-04-21T02:45:16+5:30
वातानुकूलित बस असल्याचे सांगून दुप्पट भाडे उकळणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांची खुलेआम फसवणूक करीत आहे.

भाडे ‘एसी’चे, प्रवास नॉन-एसीतून
ट्रॅव्हल्स आरटीओच्या नियंत्रणाबाहेर : चालक-वाहकाची मुजोरी
यवतमाळ : वातानुकूलित बस असल्याचे सांगून दुप्पट भाडे उकळणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांची खुलेआम फसवणूक करीत आहे. प्रवाशांना एसीचे भाडे भरुनही प्रत्यक्षात आठ ते दहा तास नॉन-एसी बसमध्ये प्रवास करावा लागत आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांची ही मुजोरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे.
लग्नसराई आणि उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी पाहून ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर जणू खुलेआम लूट सुरू आहे. जागा खाली नसल्याचे सांगून अप्रत्यक्ष तिकिटांचा ब्लॅक केला जात आहे. त्याआड तिकिटांची कृत्रिम टंचाई निर्माण करून प्रवाशांकडून दुप्पट ते तिप्पट भाडे आकारले जात आहे. बस वातानुकूलित (एसी) असल्याचे सांगून या भाड्यात आणखी वाढ केली जाते. परंतु प्रत्यक्षात या वाहनांमध्ये एसी तांत्रिक कारण सांगून जाणीवपूर्वक बंद केले जातात. अनेक ट्रॅव्हल्स बसच्या काचा पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचा जीव गुदमरतो. एसी का बंद आहे, असा प्रवाशांनी जाब विचारल्यास कॉम्प्रेसर बिघडला, बेल्ट तुटला, उन्ह जास्त आहे, थंड व्हायला वेळ लागतो, गाडी आताच सुरू झाली, दिवसभर उन्हात उभी होती, अशी कारणे सांगितली जातात. प्रवाशी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यास चालक व वाहक त्यांच्याशी वाद घालतात. त्यांना उर्मट व दादागिरीची वागणूक देऊन गाडी खाली उतरवून देण्याची धमकी दिली जाते.
ट्रॅव्हल्समधील या लुटीचे दररोज अनेक साक्षीदार तयार होतात. मात्र नियोजित ठिकाणी जायचे असल्याने कुणी या ट्रॅव्हल्सविरोधात तक्रारी करण्यासाठी वेळ खर्ची घालू इच्छित नाही. अनेक ट्रॅव्हल्समध्ये चालकाजवळील प्रवेशद्वार बंद केले जाते. वारंवार वाजवूनही ते उघडले जात नाही. कुणी तसा प्रयत्न केल्यास त्यालाच धमकाविले जाते. चालक व वाहक म्हणेल तेथेच हे दार उघडले जाते, अशाही तक्रारी आहेत. ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर पिण्याचे स्वच्छ पाणी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, पार्किंगची सुरक्षित व्यवस्था बंधनकारक आहे. परंतु बहुतांश ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर या सोईसुविधा दूर-दूरपर्यंत दिसत नाही. दहा बाय दहाच्या शेडमध्ये या ट्रॅव्हल्सचे बुकींग कार्यालय थाटले गेले आहे. त्यांनाच पाणी व प्रसाधनगृहाची सोय नाही. ते प्रवाशांना काय देणार अशी स्थिती आहे. यवतमाळात बसस्थानक चौकापासून दारव्हा रोडवर हे चित्र सहज पहायला मिळते.
ट्रॅव्हल्सच्या या मनमानी कारभारावर प्रादेशिक परिवहन विभागाचे नियंत्रण असणे बंधनकारक आहे. मात्र यवतमाळच्या डेप्युटी आरटीओ कार्यालयाशी संपर्क केला असता तक्रार आली तरच आम्ही ट्रॅव्हल्सवर कारवाई करू शकतो, अशी हतबलता एका अधिकाऱ्याने बोलून दाखविली.ट्रॅव्हल्स थेट आमच्या नियंत्रणात येत नाही. शासनाचेही थेट नियंत्रण नाही. त्याबाबत त्यांची न्यायालयात केसही सुरू आहे. ट्रॅव्हल्सचे परमीट कोणत्या प्रकारचे आहे व त्यानुसारच प्रवासी त्यात आहेत की नाही, याची तपासणी करण्याचे तेवढे अधिकार आमच्याकडे असल्याचे आरटीओच्या या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले जात आहे काय याची नियमित तपासणी बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे आणि मनुष्यबळ कमी यामुळे ते सातत्याने होत नसल्याची कबुलीही या अधिकाऱ्यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
दिग्रसच्या युवकाने केली थेट पुणे आरटीओत तक्रार
एसीचे भाडे आकारुन नॉन-एसीमध्ये प्रवास करायला लावणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या या कारभाराची दिग्रसमधील विशाल पवार या तरुणाने थेट पुण्याच्या आरटीओ कार्यालयात रितसर तक्रार दाखल केली आहे. ती यवतमाळातील नामांकित ट्रॅव्हल्स आहे. मात्र या ट्रॅव्हल्सच्या कारभाराने अनेक प्रवासी ‘चिंता’ग्रस्त असल्याचे विशाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. १७ एप्रिल रोजी ते रात्री ९.३० ला पुण्याहून एम.एच.२९-०३०३ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने दिग्रससाठी बसले असता केवळ नगरपर्यंत एसी सुरु होता. त्याचीही गती अतिशय मंद होती. नंतर तो बंद करण्यात आला. त्यासाठी बेल्ट तुटल्याचे कारण पुढे केले. १८ एप्रिलला विशाल यांनी पुन्हा दिग्रस ते पुणेचे एम.एच-२९-०७०७ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सचे तिकीट बुक केले. मात्र या गाडीचा यवतमाळपासून पाच किमी अंतरावरच एसी बंद झाला. त्यासाठी कॉम्प्रेसर बिघडल्याचे कारण दिले गेले. त्यामुळे संपूर्ण प्रवासात जागरुक प्रवासी व चालक-वाहक यांच्यात वाद सुरू होता. प्रवाशांचे समाधान करण्याऐवजी चालक-वाहक ‘पाहून घेण्याची’ भाषा वापरत असल्याचे सांगण्यात आले. ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून सुरू असलेल्या या प्रवाशांच्या फसवणुकीची चौकशी करण्याची मागणी विशाल यांनी आरटीओला निवेदनाद्वारे केली आहे.