रिलायन्स उठली ‘जीवना’वर
By Admin | Updated: November 19, 2014 22:47 IST2014-11-19T22:47:32+5:302014-11-19T22:47:32+5:30
शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरात सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या खोदकामाने उच्छाद मांडला आहे. सर्व अटीशर्थी पायदळी तुडवत खोदकम सुरू आहे.

रिलायन्स उठली ‘जीवना’वर
जलवाहिनी फोडली : ‘ओएफसी’साठी भररस्त्यांवर खोदकाम
यवतमाळ : शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरात सुरू असलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीच्या खोदकामाने उच्छाद मांडला आहे. सर्व अटीशर्थी पायदळी तुडवत खोदकम सुरू आहे. दोन दिवसापूर्वी तर खोदकाम करताना पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनीच फोडली. अनेक रस्त्यांवर आॅप्टीकल फायबर केबलसाठी चर खोदले जात आहेत. यामुळे भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. जणू रिलायन्स कंपनी यवतमाळकरांच्या ‘जीवना’वर उठल्याचे दिसत आहे.
या अतिरेकी खोदकामाचा सर्वाधिक फटका जीवन प्राधिकरण आणि दूरसंचार निगमला बसत आहे. प्रमुख बाजारपेठेसह वसाहतीमधील रस्त्यावरही खोदकाम केले जात आहे. काही ठिकाणी वीज वितरणच्या खांबांनाही धोका निर्माण झाला आहे. खोदकामाची परवानगी देताना रात्रीच खोदकाम करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र रस्त्यावर वर्दळ असतानासुध्दा खोदकाम केले जाते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कळंब चौकासारख्या वर्दळीच्या परिसरात अगदी मुख्य चौकालगत केबलसाठी चेंबर खोदले आहे. या चौकातून जड वाहतूक होते. चेंबरमुळे वाहनास अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
नगरपरिषदेने ११ सप्टेंबर २०१३ रोजी रिलायन्स कंपनीला खोदकामाची परवानगी दिली. ७५ लाख ५५ हजार २९२ रुपये नुकसानभरपाई पोटी वसूल केले आहे. खोदकामासाठी विविध अटीशर्थी लादण्यात आल्या आहेत. मात्र या अटीचे राजरोस उल्लंघन केले जात आहे. विशेष म्हणजे रिलायन्सने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी, दूरसंचार निगम यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीच परवानगी घेतली नसल्याचे पुढे आले आहे.
खोदकाम करताना रस्त्याच्या बाजुने कमीत कमी दोन मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून सव्वामीटर जागा सोडावी, भविष्यात रस्ता रुंदीकरणात केबल फुटपाथखाली येणार नाही, केबलमुळे भविष्यात रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होणार नाही. केबल टाकण्यासाठी रिलायन्सनेच अतिक्रमण काढावे, डांबरी रस्त्यावर केबल टाकताना एक ते दीड मीटर खोल टाकावी. खोदाईचे काम पुर्ण केल्यानंतर जागा अथवा रस्ता पुर्ववत करून देण्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीवर आहे. प्रत्यक्षात मात्र कुठेच कंपनीकडून खोदकाम केल्यानंतर जागा पुर्ववत करण्यात आली नाही. अनेक ठिकाण खोदकामानंतर निघालेली माती तिथेच पसरविल्याने अपघात झाले आहेत.
येथील तहसील चौकात मुख्य जलवाहीनी फुटल्याने अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला होता. अचानक मध्यरात्री प्रमुख मार्गावर पाणी साचल्याने अनेक दुचाकीस्वार स्लीप होऊन कोसळले. मात्र नगरपरिषदेकडून कोणतीच कार्यवाही केली जात नाही. अशीच स्थिती वडगाव ग्रामपंचायत, लोहारा ग्रामपंचायतीमध्ये येत असलेल्या वसाहतीतील रस्त्यांची आहे. केबल टाकण्यासाठी कंपनीने चक्क सिंमेट रोडवरही खोदकाम केले आहे. कशीबशी माती टाकून केबल झाकल्याने ठिकठिकाणी खचके पडले आहेत. याला ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाकडून कोणताच विरोध केला जात नाही. त्यामुळे नागरिकांनी कितीही संताप व्यक्त केला तरी शहरातील रस्त्यांची चाळणी करण्याचे काम अव्याहतपणे सुरू आहे. रिलायन्सचे स्थानिक इनचार्ज पांडा यांच्याशी संर्पक केला असता त्यांनी बोलण्याचे टाळले. (कार्यालय प्रतिनिधी)