नोंद ७०० गाड्यांची खरेदी केवळ १५ गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:01:02+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कापसाचे पीक घेतले. अनेक संकटातून वाचलेला कापूस घरी आल्याचे समाधान शेतकºयांना होते. नफा नुकसान काय होईल याची तमा शेतकऱ्याने कधीच बाळगली नाही. पीक आल्याच्या समाधानातच शेतकरी होता. आता मात्र कापसाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे.

नोंद ७०० गाड्यांची खरेदी केवळ १५ गाड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शेतकऱ्याला कापसाचे उत्पादन घेण्यासाठी जितके परिश्रम घ्यावे लागले नाही त्यापेक्षा अधिक घाम तो कापूस विकण्यासाठी गाळवा लागत आहे. त्यातही कापसाचा मोबदला कधी मिळेल याचा नेम नाही. कापूस खरेदी केंद्रावर ७०० गाड्यांची नोंद आहे. मात्र दिवसाला केवळ १५ गाड्या मोजल्या जातात. अशी करुण कहाणी पांढऱ्या कापसाची आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कापसाचे पीक घेतले. अनेक संकटातून वाचलेला कापूस घरी आल्याचे समाधान शेतकºयांना होते. नफा नुकसान काय होईल याची तमा शेतकऱ्याने कधीच बाळगली नाही. पीक आल्याच्या समाधानातच शेतकरी होता. आता मात्र कापसाचा दुसरा अध्याय सुरू झाला आहे. हा घरात साठवलेला कापूस पावसाळा तोंडावर आला असूनही बाजारात विकण्याची सोय नाही. खासगी खरेदीदार अतिशय पडेल दरात कापूस मागत आहे. शासनाने सीसीआयच्या माध्यमातून सुरू केलेली कापूस खरेदी मंद गतीने सुरू आहे. अशा स्थितीत शेतकरी या कापसाचे करायचे काय, या विवंचनेत अडकला आहे. सीसीआयच्या केंद्रावर कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्या तुलनेत कापसाचे मोजमाप होताना दिसत नाही. दिवसाला १० ते १५ गाड्या कापूस मोजला जातो. या गतीने कापूस खरेदी सुरू राहिल्यास पुढचा खरीप हंगाम संपला तरी मागच्या खरिपाच्या कापसाची खरेदी संपणार नाही, अशी अवस्था आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले जात आहे. स्थानिक पातळीवरून सीसीआय व पणनच्या यंत्रणेला सूचनाही दिल्या जातात. मात्र या सूचनांची कोणतीच दखल ही यंत्रणा घेताना दिसत नाही. इतकेच काय, ज्या शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला त्याच्या मोबदल्याचीही रक्कम अडकून पडली आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज आहे. हंगाम सुरू असूनही बी-बियाणे, खत घेण्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
नेर बाजार समितीत तूर, चना, सोयाबीन विक्रीसाठी तीन हजार २१२ नोंदी झाल्या आहेत. मात्र आतापर्यंत नाफेडने एक हजार १५० शेतकºयांनाच खरेदीसाठी बोलाविले. अजूनही दोन हजार ६२ शेतकरी धान्य विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकºयांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
राष्ट्रवादीचे नेर तहसीलदारांना निवेदन
शेतकऱ्यांचा शेतमाल कापूस व इतर धान्य वेळेत खरेदी करून मोबदला द्यावा यासाठी प्रशासनाने तत्काळ नियोजन करावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांनी बाजार समिती सभापती भाऊराव ढवळे यांना दिले. नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांनाही निवेदन दिले.