रावेरी गावातील रामायणकालीन आख्यायिकांना मिळाला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST2020-05-03T05:00:00+5:302020-05-03T05:00:38+5:30

गेली महिनाभरापासून दूरचित्रवाहिनीवर सुरू झालेल्या रामायण मालिकेत २६ एप्रिलपासून प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेचा त्याग, वनवास आदी प्रसंग दाखविले जात आहे. राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरीतील आख्यायिका यानिमित्त सांगितल्या जात आहेत. हा भाग पूर्वीचा दंडकारण्याचा मानला जातो.

Ramayana legends of Raveri village got light | रावेरी गावातील रामायणकालीन आख्यायिकांना मिळाला उजाळा

रावेरी गावातील रामायणकालीन आख्यायिकांना मिळाला उजाळा

ठळक मुद्देदंडकारण्याचा भाग । सीतेचे अनेक वर्षे वास्तव्य, वाल्मिक ऋषींची समाधीही आहे

के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : दूरचित्रवाहिनीवर सुरू असलेल्या ‘रामायण’ मालिकेमुळे रावेरीतील रामायणकालीन आख्यायिकांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. सीतेचे वास्तव्य, लव-कुश यांचा जन्म, वाल्मिक ऋषींची समाधी यासह सीतेला गावकऱ्यांनी नाकारलेले गहू आदी अनेक गोष्टी यानिमित्ताने चर्चिल्या जात आहे.
गेली महिनाभरापासून दूरचित्रवाहिनीवर सुरू झालेल्या रामायण मालिकेत २६ एप्रिलपासून प्रभू रामचंद्रांनी केलेला सीतेचा त्याग, वनवास आदी प्रसंग दाखविले जात आहे. राळेगावपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रावेरीतील आख्यायिका यानिमित्त सांगितल्या जात आहेत. हा भाग पूर्वीचा दंडकारण्याचा मानला जातो. प्रभू रामचंद्र यांच्या राज्याभिषेकानंतर सीता वनवासात भटकत असताना रावेरीत अनेक वर्षे वास्तव्यास होती. लव-कुश यांचा जन्म येथेच झाला. सीतेची न्हानी येथेच आहे. बारमाही वाहणारी रामगंगानदी ही रामायणातील तमसा नदी उत्तरवाहिनी आहे. वाल्मिक ऋषींची समाधी याठिकाणी आहे. लव-कुश यांच्या जन्मानंतर सीतेने गावकऱ्यांना गहू मागितले होते. त्याकाळी त्यांना कुणी गहू दिले नाही. त्यामुळे सीतेने येथे कधी गहू पिकणार नाही, असा शाप दिला होता. यामुळेच की काय गेली काही वर्षांपर्यंत गहू पिकत नव्हता असे सांगितले जाते. अश्वमेध यज्ञाचा घोडा लव-कुश यांनी रावेरी येथेच अडविला होता. यज्ञाचा घोडा परत नेण्यासाठी आलेल्या हनुमंताला लव-कुश यांनी याच ठिकाणी बांधून ठेवले होते, अशी आख्यायिका आहे. हनुमानाची १३ फुटांची मूर्ती अनेक शतकांपासून येथे रामायण काळातील घडामोडींची साक्ष देत उभी आहे. रामायणकालीन अनेक घटनांची साक्ष देणारी स्थळे येथेच आहेत. त्याप्रमाणे आख्यायिकाही प्रचलित राहिल्या आहे.

देशातील एकमेव सीता मंदिर
देशात रामाची मंदिरे अनेक आहेत. पण सीतामाईचे हे एकमेव मंदिर रावेरीत आहे. दरवर्षी सीतानवमीला या गावात लहानमोठे कार्यक्रम होतात. शुक्रवारी सीमानवमी झाली पण, संचारबंदीच्या प्रतिबंधामुळे औपचारिकतेत कार्यक्रम पार पडला. एकूणच रामायण मालिकेने रावेरीच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा त्या काळातील ऐतिहासीक, पौराणिक घटनाक्रम समोर आला.

Web Title: Ramayana legends of Raveri village got light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.