रबी लागवडही अधांतरी

By Admin | Updated: November 17, 2014 23:02 IST2014-11-17T23:02:17+5:302014-11-17T23:02:17+5:30

ज्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती, त्याच नगदी आणि प्रमुख पिकांनी यावर्षी दगा दिल्याचे सुधारीत आणेवारी घोषित झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामाने दगा दिल्याने

Rabi planting is also under construction | रबी लागवडही अधांतरी

रबी लागवडही अधांतरी

पुसद : ज्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती, त्याच नगदी आणि प्रमुख पिकांनी यावर्षी दगा दिल्याचे सुधारीत आणेवारी घोषित झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामाने दगा दिल्याने रबीच्या लागवडीचीसुद्धा सोय आता उरली नाही. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँका पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक खाईत गुरफटल्याचे दिसून येत आहे.
खरीप हंगामातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी सोयाबीनकडे पुसद परिसरातील शेतकऱ्यांचा कल गेल्या काही वर्षात वाढला होता. परंतु खरिप पिकाच्या सुधारीत आणेवारीने भयावह वास्तव उघडे पाडले. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने पीक परिस्थिती नाजूक झाली. थोड्याफार प्रमाणात का होईना, शेतकऱ्यांना हातभार मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली आहे.
शासनाकडून आता किती व कधी मदत मिळते, कोणत्या सोयी-सुविधा मिळतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे आणि यावरच शेतकऱ्यांचे पुढिल नियोजन अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे दिसून येत आहे. अतिशय परिश्रमाने खरीपपूर्व मशागत शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर लागवड, दुबार व तिबार पेरणीचे संकट सारे काही सोसल्यानंतरही हाती मात्र काहीच लागले नाही.
मृग पावसाची प्रतिक्षा केली, परंतू रिमझिम, संततधार पावसाच्या हजेरीने पिकांची उगवण, वाढ, पोषण यावर परिणाम झाला. पिकांची हानी झाली, चारा तयार झाला नाही. पिकाला पोषक वातावरण भेटलेच नाही. पर्यायाने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला.
पुसद कृषी उपविभागात सोयाबीनचा पेरा १ लाख ९३३ हेक्टर झाला. पुसद तालुक्यामध्ये ३३ हजार ६६ हेक्टरवर पेरणी झाली. दिग्रसमध्ये १३ हजार ८३० हेक्टर, उमरखेडमध्ये ३२ हजार ९८० आणि महागांवमध्ये २० हजार ६४७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. पुसद तालुक्यात भयावह चित्र आहे. पाणी, चारा, रोजगार आदी प्रश्नांनी नागरिकांची झोप उडाली आहे. शेतकऱ्यांचा खर्च खरीप पिकांतून निघाला नाही. नजरअंदाज आणेवारीवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर सुधारीत आणेवारी ४२ पैसे काढण्यात आली. १०० टक्के उत्पन्नाच्या जागी शेतीतून केवळ ४२ टक्के उत्पन्न झाल्याचे शासानाकडून अधिकृत सांगण्यात आले आहे.
शेतीच्या बांधावर चित्र काही औरच आहे, अडीच क्विंटल बियाण्याला केवळ दोन क्विंटल उत्पादन निघाले आहे. पेरणी इतकेही उत्पादन मिळाले नाही. त्यात नंतरचा काढणीचा खर्च १५०० रुपये एकरी व मळणीयंत्रासाठी ३०० रुपये पोते मोजावे लागल्याने शेतकऱ्यांनी निघालेले सोयाबीन काढणीवाल्यांनाच दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.
येणाऱ्या हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावे लागत आहे. जशी पिकांची स्थिती तशीच पाणी आणि चाऱ्याचीही टंचाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अधांतरी आहे. शासनाकडून काढलेल्या सुधारीत आणेवारीहून डिसेंबर अखेरपर्यंत अंतीम आणेवारी ही ५० टक्केच्या आतच येण्याची दाट शक्यता आहे. पुसद उपविभागात दुष्काळस्थिती असल्याने संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. दुष्काळातून सावरण्यासाठी शासनस्तरावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Rabi planting is also under construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.