शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसताना वाढवले भाव, शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 18:27 IST2025-04-01T18:26:01+5:302025-04-01T18:27:13+5:30
Yavatmal : नाईलाजाने कमी भावात विकावा लागला कापूस

Prices increased when farmers had no cotton left, causing intense anger among farmers
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : काही महिन्यांपासून खासगी कापूस खरेदी केंद्रांवर कापसाचे भाव सहा हजार ८०० च्या आसपास राहिले होते. मागील महिन्यापर्यंत कापसाचे भाव वाढण्याचे संकेत नव्हते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तीन ते चार महिन्यांपासून साठवलेला कापूस विकला. त्यानंतर मात्र कापसाचे भाव एक हजारांपेक्षा जास्त वाढले आहेत. या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांनाच अधिक होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
वणी तालुक्यात सुरुवातीपासून खासगी खरेदी केंद्रांत कापसाचा भाव सहा हजार ५०० रुपयांपासून सात हजारांपर्यंत कायम राहिला, तर सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर ७ हजार ४०० पर्यंत भाव होता. अतिवृष्टी, विविध किडींचा प्रादुर्भाव, अशा अनेक संकटांवर मात करून हाती आलेल्या कापसाला बाजारात मिळालेला भाव व त्यानंतर सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी लागणारी ऑनलाइन प्रक्रिया अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी घरात साठवलेला कापूस सीसीआय केंद्रांवर विक्रीसाठी मोठ्या रांगा दिसून आल्या.
नाईलाजाने कमी भावात विकावा लागला कापूस
- खासगी बाजारातही शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजेनुसार मिळेल त्या भावात, काही ठिकाणी उधारीवर, उसनवारीवर तसेच शेतीखर्चासाठी लागणाऱ्या बी-बियाणे व खतांच्या खर्चापायी विकला.
- असे चित्र असताना आता कापूस शिल्लक नसताना कापसाच्या भावात ७ हजार ६०० ते ७ हजार ८०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र आहे. परंतु, याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संतप्त भावना आहे.
"गेली काही वर्षे कापसाला दहा हजारांहून अधिक भाव मिळाला होता. परंतु, दोन वर्षांपासून सहा हजारांच्या आसपास भाव मिळत आहे. यावर्षी चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, साठवलेल्या कापसाचे वजन घटल्याने नुकसान झाले."
- प्रभाकर डाखरे, शेतकरी.