भाजपाच्या मंत्र्यासाठी संघाचा दबाव
By Admin | Updated: January 7, 2015 22:59 IST2015-01-07T22:59:55+5:302015-01-07T22:59:55+5:30
जिल्ह्यात भाजपाचा कॅबिनेट मंत्री द्यावा, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सरकारवर दबाव वाढविला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार आहेत. मात्र दोन्ही वेळा

भाजपाच्या मंत्र्यासाठी संघाचा दबाव
यवतमाळ :जिल्ह्यात भाजपाचा कॅबिनेट मंत्री द्यावा, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सरकारवर दबाव वाढविला जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार आहेत. मात्र दोन्ही वेळा यातील एकालाही मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही. उलट एक आमदार असूनही शिवसेनेला महसूल राज्यमंत्रिपद दिले गेले. या मंत्रिपदाच्या बळावर शिवसेना जिल्हाभर स्ट्राँग होण्याची हूरहूर भाजपा आणि संघाच्या नेत्यांना आहे. म्हणूनच त्यांनी भाजपाला कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात मंत्रिपद मिळावे यासाठी दबाव वाढविणे सुरू केले आहे. मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यवतमाळची जागा संघातील सक्रिय पदाधिकाऱ्यांसाठी सोडावी, अशी जोरदार मागणी केली होती. त्यांनी सुरुवातीपासूनच यवतमाळात तोच तो चेहरा देण्याऐवजी संघातील नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असा रेटा लावला होता. मात्र अखेरच्या क्षणी जुन्याच चेहऱ्यावर तडजोड करून संघाने त्याला विजयही मिळवून दिला. आता संघाने पुन्हा आपले सरकारवरील वजन वापरणे सुरू केले आहे.
राज्यमंत्रिपदाच्या माध्यमातून शिवसेनेने आपली गती वाढविली आहे. त्या तुलनेत पाच आमदार असूनही भाजपाला वाव नाही. म्हणून आगामी मंत्रीमंडळ विस्तारात जिल्ह्याला एक कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी मागणी संघातून रेटली गेली आहे. शिवसेनेच्या पक्षवाढीची भीती दाखवून भाजपासोबतच आता संघानेही मंत्रीपदाची मागणी लावून धरल्याने स्पर्धेतील भाजपा आमदारांच्या आशा बळावल्या आहेत. या आमदारांनी आपल्या गॉडफादरमार्फत जोरदार फिल्डींगही लावली आहे. त्यासाठी सरकारमधील सामाजिक वाटा आणि समतोलाचा हवाला दिला जात आहे. आदिवासी समाजाने विदर्भातून सरकारमध्ये संधी मिळावी म्हणून प्रयत्न चालविले आहे. पांढरकवडा येथील आदिवासी समाजाच्या आमदारासाठी खुद्द केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी लॉबिंग चालविली आहे. संघाने यवतमाळच्या आमदाराचे नाव रेटले असताना त्यांना पांढरकवड्यातून स्पर्धक निर्माण झाला आहे. या स्पर्धकाने अलिकडे मुंबई-दिल्लीच्या वाऱ्या अचानक वाढविल्याने संभाव्य लालदिव्याचा प्रकाश यवतमाळात पडणार की पांढरकवड्यात असा प्रश्न भाजपाच्या गोटात उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)