सिंधीवाढोणा येथील जिजाबाईच्या मृत्यूची सखोल चौकशी करा
By Admin | Updated: May 8, 2016 02:00 IST2016-05-08T02:00:00+5:302016-05-08T02:00:00+5:30
झरी तालुक्याच्या सिंधीवाढोणा येथील जिजाबाई उईके या महिलेच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी,

सिंधीवाढोणा येथील जिजाबाईच्या मृत्यूची सखोल चौकशी करा
घातपाताचा संशय : भावाचे मुकुटबन पोलिसांना निवेदन सादर
यवतमाळ : झरी तालुक्याच्या सिंधीवाढोणा येथील जिजाबाई उईके या महिलेच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन माथार्जुन येथील तिच्या भावाने मुकुटबन पोलिसांना सादर केले आहे.
वासुदेव खुदाराम सोयाम असे या भावाचे नाव आहे. त्यांनी मुकुटबन पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार २० मे २०१५ रोजी जिजाबाईला घेऊन तिचा पती धुळबा आत्माराम उईके हे मजुरांसह शेतात गेले होते. दुपारी १२ वाजता मजूर आणि धुळबा घरी परतले. परंतु जिजाबाई घरी आलीच नाही. ती बेपत्ता झाल्याचे नाटक धुळबा यांनी केल्याचा आरोप सोयाम यांनी केला आहे. जिजाबाईला सोडून धुळबा घरी आलाच कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जिजाबाई बेपत्ता झाल्यापासून अंत्यसंस्कारापर्यंत आपणास कोणताही निरोप दिला नाही, तिचा अंत्यसंस्कार रात्री २ वाजता का केला आणि मला व माझ्या कुटुंबियांना विश्वासात का घेतले गेले नाही, असा सवाल त्यांनी निवेदनात केला आहे.
शेतीच्या हिस्सेवाटणीवरून जिजाबाई सोबत नेहमीच वाद होत होते. या वादातच जिजाबाईचा खून करून तिचा मृतदेह गावाशेजारी टाकला असावा, त्यात कुटुंबाचा हातभार असावा व नंतर तो मृतदेह पशुपक्षांनी तोडला असावा अशी शंकाही सोयाम यांनी वर्तविली आहे. जंगली जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे दाखवून शासनाकडून आठ लाख रुपयेसुद्धा वसूल केले गेले. ही शासनाची फसवणूक असल्याचा आरोप सोयाम यांनी केला आहे. जिजाबाईच्या मृत्यूची फेरतपासणी करण्यात यावी, असे निवेदन सोयाम यांनी ९ मार्च रोजी मुकुटबन ठाणेदाराला सादर केले. पोलीस अधीक्षक कार्यालयातही हे निवेदन केले गेले.
या प्रकरणाचा तपास मंदगतीने सुरू आहे, संशयित मोकळे फिरत असल्याने मुकुटबन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर व प्रामाणिकपणावर साशंकता वाटत असल्याचेही सोयाम यांनी निवेदनात नमूद केले आहे.