अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा प्लॅन
By Admin | Updated: January 10, 2015 23:02 IST2015-01-10T23:02:11+5:302015-01-10T23:02:11+5:30
शहरात ३ ते ९ जानेवारी पर्यंत अतिक्रमण हटाओ मोहीम राबवून त्यात सुमारे ७५० दुकाने भूईसपाट करण्यात आली. या बेरोजगार झालेल्या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा विचार प्रशासकीयस्तरावर

अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा प्लॅन
यवतमाळ : शहरात ३ ते ९ जानेवारी पर्यंत अतिक्रमण हटाओ मोहीम राबवून त्यात सुमारे ७५० दुकाने भूईसपाट करण्यात आली. या बेरोजगार झालेल्या अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाचा विचार प्रशासकीयस्तरावर सुरू आहे. त्यासाठी शहरातील ई वर्ग-शासकीय जमिनींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
अतिक्रमण हटाओ मोहिमेत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने हटविली गेली. त्यामुळे हजारो संसार उघड्यावर आले. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्षानुवर्षे चालणारा रोजगार अतिक्रमण मोहिमेत अचानक नष्ट झाल्याने या परिवारांवर संकट कोसळले आहे. मात्र त्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनानेच पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी यवतमाळ शहरातील रिक्त आणि वापरात येऊ शकतील अशा शासकीय जमिनींची यादी सादर करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना दिले आहे.
या जागा शोधून त्यावर तातडीने काय उपाययोजना करता येते किंवा पर्याय म्हणून ही जागा देता येऊ शकते का, याचा विचार केला जात आहे. त्यात टीबी हॉस्पिटलच्या जागेला प्राधान्य दिले जात आहे. त्या दृष्टीने प्लॅन बनविला जाणार असल्याचे महिवाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
महिवाल म्हणाले, अतिक्रमण हटाओ मोहीम ही केवळ यवतमाळपुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांना या संबंधीचे आदेश दिले आहेत. प्रत्येक आठवड्याला या मोहिमेचा सर्व नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. यवतमाळात हटविलेले अतिक्रमण पुन्हा होऊ नये म्हणून संयुक्त भरारी पथक राहणार आहे.
अतिक्रमण हटविलेल्या जागेचा विस्तार व सौंदर्यीकरणासाठी वापर केला जाणार आहे. यवतमाळ शहराच्या विकासाच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल.
अतिक्रमण हटाओ मोहिमेच्या यवतमाळ शहरातील दुसऱ्या टप्प्याचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील नगरपरिषदांना या मोहिमेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला जाणार आहे. (शहर वार्ताहर)