कालवा भूसंपादन मोबदल्यासाठी पायपीट
By Admin | Updated: June 12, 2017 02:04 IST2017-06-12T02:04:16+5:302017-06-12T02:04:16+5:30
आमडापूर प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्त पायपीट करीत आहे.

कालवा भूसंपादन मोबदल्यासाठी पायपीट
आमडापूर प्रकल्प : उमरखेड एसडीओ कार्यालयाची दिरंगाई
विश्वनाथ महामुने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : आमडापूर प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्त पायपीट करीत आहे. उमरखेड उपविभागीय कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईने शेतकरी हतबल झाले आहे.
उमरखेड तालुक्यातील आमडापूर येथे सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या कालव्यासाठी महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीचा मोबदला आठ वर्षांपूर्वी मंजूर झाला. पाटबंधारे विभागाकडून संबंधित मोबदल्याची रक्कम उपविभागीय कार्यालयाकडे वळती करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मोबदलाच मिळाला नाही. सुरुवातीला धरणासाठी जमीन गेली. उर्वरित जमिनीचा तुकडा पुन्हा कालव्यासाठी संपादित करण्यात आला. परंतु कालव्याच्या जमीन संपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळालाच नाही. महसूल प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे फुलसावंगी येथील प्रकल्पग्रस्त संतप्त झाले आहे. या शेतकऱ्यांनी महागाव तहसील कार्यालयावर मोर्चा आणला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही.
भूसंपादनाची प्रक्रिया झाल्यानंतर कालवे तयार करण्यात आले. या प्रकल्पात लघुपाट क्र.४ आणि लघुपाटाच्या बांधकामाकरिता शेतकऱ्यांचा निवडा करून अवॉर्ड मंजूर करण्यात आले. मोबदल्याची ९० लाख ३६ हजार ६७४ रुपये रक्कम उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग पुसद यांनी उमरखेड उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आली. याला आता मोठा कालावधी लोटला आहे.
शेतकऱ्यांच्या मोबदल्याची रक्कम उमरखेड कार्यालयात पडून आहे. परंतु ती रक्कम प्रकल्पग्रस्तांना देण्याचे सौजन्य या विभागाने दाखविले नाही. या मोबदल्यासाठी शेतकरी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. परंतु त्यांना अवाजवी त्रुट्या दाखवून वारंवार पूर्तता करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे आता आपणास मोबदला मिळणारच नाही, असे उद्गार अनेक शेतकरी काढत आहे.