ओव्हरबर्डन मॅनेजमेंटचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 20:54 IST2017-09-02T20:54:30+5:302017-09-02T20:54:46+5:30

कोळसा उत्खणनानंतर खाणीतून निघणाºया मातीचे योग्य व काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्रालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेकोलिला मिळाल्या असल्या तरी .....

Overdraft management wastage | ओव्हरबर्डन मॅनेजमेंटचा बोजवारा

ओव्हरबर्डन मॅनेजमेंटचा बोजवारा

ठळक मुद्देवणी वेकोलि क्षेत्र : मातीचे ढिगारे शेतकºयांच्या मुळावर, मंत्र्यांकडून समस्या दुर्लक्षित

संतोष कुंडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : कोळसा उत्खणनानंतर खाणीतून निघणाºया मातीचे योग्य व काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्रालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेकोलिला मिळाल्या असल्या तरी वेकोलिकडून मात्र या नियमांचे कोणतेच पालन केले जात नसल्याने वेकोलिने उभे केलेले नियमबाह्यमातीचे ढिगारे शेतकºयांच्या मुळावर उठले आहेत. या ढिगाºयांमुळे वेकोलि बाधित क्षेत्रातील शेतीच्या उत्पादनाला मोठा फटका बसत आहे.
या ढिगाºयांमुळे शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत असले तरी प्रकल्पग्रस्तांच्या, खाण बाधितांच्या वेदनेशी नातं सांगणाºया केंद्रातील ‘वजन’दार मंत्र्यांकडूनही ही समस्या दुर्लक्षित केली जात असल्याने या भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विशेषत: कोळसा खाण क्षेत्रातील शेतकºयांना प्रदूषणासह मातीच्या ढिगाºयांमुळे निर्माण झालेल्या समस्यांशी झुंजावे लागत आहे.
वणी तालुक्यात १२ कोळसा खाणी आहेत. त्यांपैैकी दोन भूमिगत तर १० खुल्या कोळसा खाणी आहेत. यातील घोन्सा येथील कोळसा खाण निविदा न काढल्यामुळे सध्या बंद अवस्थेत आहे, तर राजूर व पिंपळगाव या दोन खाणी भूगर्भातील कोळसा संपुष्टात आल्याचे कारण देऊन बंद करण्यात आल्या आहेत. सध्या ९ कोळसा खाणींमधून कोळशाचे उत्पादन केले जात आहेत.
खाणीतून निघालेल्या मातीचे ढिगारे उभे करताना अनेक नियम आहेत. बेंचेस पद्धतीने ढिगारे उभे करून त्यावर वृक्षारोपण करणे हा महत्वाचा नियम आहे. ढिगारा जर नैैसर्गिक जलस्त्रोता शेजारी असेल तर ढिगाºयावरून वाहणारे पावसाचे पाणी किंवा चिखल त्या जलप्रवाहात जाऊ नये, यासाठी ढिगाºयाभोवती संरक्षक भिंत बांधण्याचा नियम आहे. मात्र बहुतांश ढिगारे बेंचेस पद्धतीने उभारण्यात आले नाहीत किंवा त्या ढिगाºयाभोवती संरक्षण भिंतदेखील बांधण्यात आली नाही. त्यामुळे या ढिगाºयावरून वाहणारे पाणी थेट शेतात जाते किंवा शेतातून पाण्याचा निचरा होत नाही.

जंगली श्वापदांकडून पिकांची नासाडी
वेकोलिने उभ्या केलेल्या मातीच्या अनेक ढिगाºयावर वेकोलिने वृक्षारोपण केले. मात्र त्यामुळे शेतकºयांपुढे जंगली श्वापदांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ढिगाºयाच्या काठालगत असलेल्या शेतांमध्ये पावसामुळे पाणी साचतेच सोबतच या ढिगाºयांवरील झुडपे जंगली श्वापदांची वस्तीस्थाने बनली आहेत. पीक भरीवर आले की, या झुडपांत वास्तव्याला असलेले रोही, रानडुकरे शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करीत आहेत.
 

Web Title: Overdraft management wastage