भर उन्हाळ्यात १०८ निराधार वृद्धांची पाण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:34 IST2019-04-15T21:34:40+5:302019-04-15T21:34:54+5:30
निराधार माणसांना हा समाज उपाशी राहू देत नाही. घासातला घास देण्यासाठी दानशूर लोक तयार असतातच. उमरीच्या वृद्धाश्रमाने तर याचा वास्तूपाठच घालून दिलेला आहे. पण याच वृद्धाश्रमातील १०८ वृद्ध मायबापांचा कंठ पाण्यासाठी कसाविस झाला आहे. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटर धाव घ्यावी लागत आहे. अन्नदानासाठी हात पुढे करणाऱ्यांनी आता जलदानासाठीही श्रावणबाळ होण्याची गरज आहे.

भर उन्हाळ्यात १०८ निराधार वृद्धांची पाण्यासाठी वणवण
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निराधार माणसांना हा समाज उपाशी राहू देत नाही. घासातला घास देण्यासाठी दानशूर लोक तयार असतातच. उमरीच्या वृद्धाश्रमाने तर याचा वास्तूपाठच घालून दिलेला आहे. पण याच वृद्धाश्रमातील १०८ वृद्ध मायबापांचा कंठ पाण्यासाठी कसाविस झाला आहे. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटर धाव घ्यावी लागत आहे. अन्नदानासाठी हात पुढे करणाऱ्यांनी आता जलदानासाठीही श्रावणबाळ होण्याची गरज आहे.
शासनाचा कोणताही आधार नसताना केवळ आणि केवळ माणूसकीच्या बळावर चालणाऱ्या संत दोलाराम महाराज वृद्धाश्रमाला तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. उमरीपठार (ता. आर्णी) येथील शेषराव डोंगरे यांच्या प्रचंड धडपडीतून हा वृद्धाश्रम उभा आहे. शासनाची केवळ २५ वृद्ध ठेवण्याची मान्यता असतानाही त्यांनी माणुसकीच्या जाणीवेतून १०८ वृद्धांचा सांभाळ केला आहे. आर्णी, यवतमाळ, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रससारख्या ठिकाणचे दानशूर या वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी सदैव उभे राहतात.
मात्र, आता अन्नाहून भीषण संकट उभे झाले आहे. वृद्धाश्रमात असलेल्या चारही बोरवेल आटल्या आहेत. पण अशाही संकटात एक शेतकरी धावून आला. उमरी शिवारातीलच शेतकरी बंडू शेरे यांच्या विहिरीतून दररोज मोफत पाणी वृद्धाश्रमाला दिले जाते. पण अडचण ही आहे की, ही विहीर आश्रमपासून तीन किलोमीटरवर आहे. शेषराव डोंगरे, जयप्रकाश डोंगरे दररोज ट्रॅक्टरने तेथून पाणी आणत आहेत. त्याचा रोजचा खर्च हजार रुपये आहे.
अनुदानाशिवाय चालणाºया वृद्धाश्रमाला या कामासाठी दानशूरांची गरज आहे. वृद्ध आईबाबांची तहान भागविण्यासाठी ‘श्रावणबाळां’नी किमान एक हजारांची मदत करावी, एवढेच आवाहन या वृद्धाश्रमाने केले आहे.