वीज वितरणविरुद्ध उद्रेक
By Admin | Updated: September 30, 2014 23:42 IST2014-09-30T23:42:17+5:302014-09-30T23:42:17+5:30
वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना विजेअभावी सिंचन रखडले आहे. यामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

वीज वितरणविरुद्ध उद्रेक
महागाव तालुका : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला
महागाव/बिजोरा : वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना विजेअभावी सिंचन रखडले आहे. यामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटत असून शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकत आहे.
महागाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाचा पत्ता नाही. पोळ्याच्या आठवड्यात कोसळलेल्या पावसाने पिके जोमाने वाढत होती. मात्र आता उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत असल्याने पीक करपत आहे. अशा स्थितीत शेतकरी ओलित करण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ओलित करणे शक्य होत नाही. मुडाणा उपकेंद्रांतर्गत बिजोरा, कोठारी या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील शेतकरी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले.
या ठिकाणी कोणताही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. चौकशी केली असता अधिकारी यवतमाळला असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकरी सहायक अभियंता कार्यालयावर धडकले. परंतु त्या ठिकाणीही अधिकारी हजर नव्हता. परंतु या ठिकाणी सवना येथील शाखा अभियंता झामरे उपस्थित होते. त्यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीसुद्धा उडवाउडवीचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले.
सवना फिडरवरील गावे कोठारी फिडरवर का जोडण्यात आली, असा सवाल करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांना समाधानकर उत्तरे देऊ शकली नाही. कोठारी, बिजोरा या ठिकाणी दोन ट्रान्सफार्मर उभे केले आहे. परंतु एकही कार्यान्वित केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ओलित करणे शक्य होत नाही. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकरी वारंवार विनंती करतात. परंतु कुणीही दखल घेत नाही.
अशीच परिस्थिती महागाव तालुक्यातील करंजखेड जुने येथील आहे. येथील सिंगल फेजची डीपी गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. वारंवार विनंती करूनही उपयोग झाला नाही. काही दिवसापूर्वी तर शेतकऱ्यांनी मोर्चाही काढला होता. परंतु उपयोग झाला नाही. अद्यापही सिंगल फेज योजना सुरू झाली नाही. शेतातील डीपीवरूनच गावाला वीज पुरवठा केला जात आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. गेल्या वर्षभरापासून शेतकरी त्रस्त झाले आहे. यावर उपाययोजना करावी म्हणून करंजखेडचे शेतकरी वीज वितरण कंपनीच्या महागाव कार्यालयावर पोहोचले. या ठिकाणी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रवीण ठाकरे, चेतन ठाकरे, शेषराव देशमुख, रमेश भांगे, किशोर अडकिने, सुभाष भांगे, अमित भांगे, नथ्थू भांगे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. परंतु या शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. अशीच स्थिती महागाव तालुक्यातील इतरही गावांची आहे. गावामध्ये वीज पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच कृषी फिडरवरील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू शकतो. परंतु वीज वितरण कंपनी कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)