लोकअदालतीत १८०० प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:36 IST2018-07-14T22:34:30+5:302018-07-14T22:36:06+5:30
रखडलेली प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाकडून जिल्हा आणि तालुकास्तरावर लोकअदालत घेण्याचे निर्देश दिले आहे.

लोकअदालतीत १८०० प्रकरणे निकाली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रखडलेली प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाकडून जिल्हा आणि तालुकास्तरावर लोकअदालत घेण्याचे निर्देश दिले आहे. यवतमाळ जिल्हा विधी सेवा समितीने शनिवारी घेतलेल्या लोकअदालतमध्ये प्रलंबित एक हजार ८३५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. निकाली निघालेल्या प्रकरणांचे तडजोडमूल्य पाच कोटी २२ लाख दोन हजार १७ रुपये आहे.
राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीपकुमार मोरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम.आर.ए.शेख यांनी पुढाकार घेतला. याकरिता वकील, शासकीय अधिकारी, पक्षकार, विविध संस्थेतील व राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी यांच्या बैठका घेऊन लोकअदालतचे महत्व पटवून दिले.
शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुका विधी समितीकडून लोकअदालत घेण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा सरकारी वकील, सहायक सरकारी वकील, भू-अर्जन अधिकारी, बेंबळा प्रकल्पाचे अधिकारी, सहकारी बँका, विमा कंपन्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी, विभाग नियंत्रक, परिवहन महामंडळाचे अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा वकील संघाचे अॅड. मिनाज मलनस यांच्यासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.