सोयाबीन बियाण्यांच्या ठोक विक्रेत्यांना विक्रीबंद आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:00 IST2020-06-17T05:00:00+5:302020-06-17T05:00:41+5:30
यवतमाळ शहर व जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने शेतकऱ्यांना बियाणे विक्री केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांच्या पथकाने यवतमाळातील प्रमुख आठ वितरकांच्या गोदामांची तपासणी केली.

सोयाबीन बियाण्यांच्या ठोक विक्रेत्यांना विक्रीबंद आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गोदामातील सोयाबीन बियाण्यांच्या साठ्यात तफावत आढळल्याने यवतमाळातील चार ठोक बियाणे विक्रेत्यांना विक्रीबंद आदेश देण्यात आले आहे.
दिलीप बोगावार यांचे कृषी प्रगती, संजय कोषटवार यांचे सुदर्शन कृषी केंद्र, राम जाजू यांचे जाजू कृषी केंद्र आणि ओमप्रकाश गुप्ता यांच्या कृषी कल्पतरू या बियाणे विक्री प्रतिष्ठानांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी दत्तात्रय आवारे यांनी ही कारवाई केली. उपरोक्त गोदामांची तपासणी केली असता तेथील रेकॉर्ड व प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळली. त्यामुळे या कृषी केंद्रांना विक्रीबंद आदेश अर्थात सोयाबीन बियाणे विकण्यास मनाई करून या संबंधीची कागदपत्रे मागण्यात आली आहे. ही कागदपत्रे सादर झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.
आठ गोदामांची तपासणी
यवतमाळ शहर व जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या प्रमुख वितरकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने शेतकऱ्यांना बियाणे विक्री केली जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बरडे यांच्या पथकाने यवतमाळातील प्रमुख आठ वितरकांच्या गोदामांची तपासणी केली. जिल्हाधिकारी यावर अहवालावरून कारवाई करतील. याशिवाय स्वत: कृषी विभाग आपल्या स्तरावर कारवाई करणार आहे. या गोदाम मालकांची सुनावणी घेऊन म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. त्यावर समाधान न झाल्यास परवाना निलंबन केले जाईल.
अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना
आर्णी येथील गोदामांची तेथीलच कृषी विभागाने तपासणी केली. पुसदची तपासणी अद्याप बाकी आहे. यवतमाळातील तपासणीचा अहवाल लवकरच जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडे सादर केला जाणार आहे. त्यावर ते काय कारवाई करतात हे महत्वाचे ठरते.
सोयाबीन बियाण्यांच्या ठोक विक्रेत्यांचे गोदाम तपासणी प्रकरणात जिल्हाधिकाºयांशिवाय कृषी विभागालाही स्वतंत्र कारवाईचे अधिकार आहे. आवश्यकतेनुसार ही कारवाई केली जाईल.
- पंकज बरडे, प्रभारी, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ