चपराश्यांच्या भरवशावर चालतो नगरपरिषदेचा कारभार
By Admin | Updated: July 26, 2015 02:25 IST2015-07-26T02:25:26+5:302015-07-26T02:25:26+5:30
येथील नगरपरिषद प्रशासनामध्ये आकृतिबंधानुसार पदे मंजूर असतानाही पदभरती झाली नाही.

चपराश्यांच्या भरवशावर चालतो नगरपरिषदेचा कारभार
उमरखेड नगरपरिषद : आकृतिबंध मंजूर मात्र पदभरती नाही
उमरखेड : येथील नगरपरिषद प्रशासनामध्ये आकृतिबंधानुसार पदे मंजूर असतानाही पदभरती झाली नाही. परिणामी विविध विभागांमध्ये लिपिकांची पदे रिक्त असल्याने कामांचा भार चपराशांवर आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
उमरखेड नगरपरिषदेची नोकर भरती आकृतिबंध मंजुरीच्या नावाखाली रखडली होती. अखेर २००६ मध्ये आकृतिबंध मंजूर झाला. परंतु १० वर्ष होऊनही नोकर भरती करण्यात आली नाही. लिपिकांची सर्व कामे शिपायांच्या भरवशावर उरकून घेऊन नगरपरिषदेचा गाडा पुढे रेटला जात आहे. या सर्व प्रकारामध्ये मूळ आस्थापनेतील शिपायांना जबाबदार धरावे की शिपायातून नेमणूक करण्यात आलेल्या लिपिकांना जबाबदार धरावे हा प्रश्न आहे. अशा कामचलावू बाबींमुळे कित्येक वेळा प्रशासनिक धांदल उडत असल्याची बाब समोर येत आहे. नगर प्रशासनात राज्य संवर्गातील वर्ग तीनची एकूण दहा पदे मंजूर आहेत. त्यापैकी आठ पदे अद्यापही रिक्त आहेत. नगरपालिका संवर्गातील वर्ग तीनची २० पदे मंजूर असूनही त्यापैकी १४ पदे रिक्त आहेत. नगरपालिका संवर्गातील वर्ग चारची १०४ पदे अहोत. त्यापैकी ५८ मंजूर असून, सहा पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत कर विभागात आठ, पाणी पुरवठा विभागात चार, आरोग्य विभागात दोन, बांधकाम विभागात दोन, उद्यान विभागात एक, आणि ग्रंथालय विभागात दोन शिपायांच्या भरवशावर कामे उरकली जात आहे. निरनिराळ्या विभागांमध्ये १९ शिपायांच्या खांद्यावर बाबूगिरी लादली गेली आहे. हे सगळे करत असताना त्यांना वेतन मात्र आस्थापनाच्या नियमांद्वारेच मिळत आहे. रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)