आता बोगस बियाण्यांचा विळखा
By Admin | Updated: June 21, 2017 00:31 IST2017-06-21T00:31:47+5:302017-06-21T00:31:47+5:30
खरीप हंगामाची पूर्व तयारी म्हणून शेतकऱ्यांनी घाई गडबडीत जवळच्या कृषी केंद्रांमधून विविध कंपन्यांच्या

आता बोगस बियाण्यांचा विळखा
शेतकऱ्यांची फसवणूक : कृषी विभागाच्या भरारी पथकावर प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : खरीप हंगामाची पूर्व तयारी म्हणून शेतकऱ्यांनी घाई गडबडीत जवळच्या कृषी केंद्रांमधून विविध कंपन्यांच्या बियाणे व खतांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. शेतात पेरणीनंतर अनेक कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्यामुळे ती उगवलीच नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. यामुळे आर्थिक भुर्दंड व दुबार पेरणीची समस्या त्यांना भेडसावत आहे.
आठ दिवसांपूर्वी पेरणी झालेल्या सोयाबीन वाणाचे बियाणे अद्यापही न उगवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. संबंधित कृषी विभागाने याबाबत कृषी केंद्र संचालकांकडून सोयाबीन कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने घेतले असल्याची माहिती आहे. तालुक्यातील काही कृषी केंद्रातून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण झालीच नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे.
सर्वसामान्य गरजू शेतकऱ्यांनी उधारी व उसणवारी करून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी कशी तरी तजवीज केली. एवढे केल्यानंतरही शेतात पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. याबाबत त्यांनी संबंधित कृषी केंद्र संचालकांकडे संपर्क साधला असता त्यांनी हात वर केले. कुणीही याबाबत ऐकून घेण्यास तयार नाही. बियाणे कंपन्यांकडून झालेल्या या फसवणुकीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून अशा फसव्या कंपन्यांवर नियंत्रण आणून कृषी विभागाने शेतकऱ्यांची ही फसवणूक थांबवावी व बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शेतकरी आर्थिक कुचंबणेसोबतच बनावट माल बनविणाऱ्या बियाणे व खते कंपन्यांच्या जाचामुळे त्रस्त आहे. एकीकडे शेतकऱ्यांची अशा प्रकारे हेळसांड होत असताना दुसरीकडे अशावेळी कोणत्याही संघटनेचे अथवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यावर आवाज उठविण्यास तयार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे काही दुकानदार व बियाणे विक्रेते शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.
कृषी विभागाकडे तक्रार केल्यानंतरही आवश्यक त्या वेगाने त्यावर कारवाई होत नाही, त्यामुळे सबंधित कृषी केंद्र चालकाला प्रकरण दडपण्यास वेळ मिळतो. कृषी विभागाकडून केवळ कारवाईचा देखावा केला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
कृषी विभागाची बघ्याची भूमिका
एकीकडे बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसताना आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असताना जिल्हा कृषी विभागाने तयार केलेली शोधमोहीम पथक आणि तालुका कृषी कार्यालये नेमके करतात काय, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकाऱ्यांनी धाडी टाकून कारवाई केली. तालुकास्तरावरून वेळीच कारवाई झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
दिग्रस तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये रोष
दिग्रस : बियाणे न उगवण्याचे अनेक प्रकार दिग्रस तालुक्यातही आता उघडकीस आले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. तालुक्यातील कलगाव येथील शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाण्यांची आपल्या शेतात लागवण केली. त्यानंतर सलग आठ-दहा दिवस पाऊस येवूनही बियाणे उगवलेच नाही. कृषी केंद्रवाल्याने बनावट बियाणे दिल्याचा आरोप करून या प्रकरणी चौकशीची मागणी येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कलगाव येथील देवा कृषी केंद्रामधून शेतकऱ्यांनी हे महाबीजचे सोयाबीन विकत घेतले होते. परंतु आता ते उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसोबतच मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. निवेदन देताना शेख जफर, शेख मुनाफ, विलास भगत, राजपाल बन्सोड, राजेंद्र मनोहर, अफरोजोद्दीन फायरोजोद्दीन, नंदकिशोर मनवर, अ.अनिस म. जलील, जाकीर म. गफ्फार, सरपंच कुदूस खॉ, रोशन खॉ, सचिन इंगळे आदी शेतकरी उपस्थित होते.