वणीत धान्यासाठी गरजूंची धावाधाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:06+5:30
वणी तहसील परिसरात दररोज ५० व त्यापेक्षा अधिक लोक धान्याच्या गरजेपोटी येत आहेत. राशन दुकानातून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे वितरण शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे शहरातील अनेक दानदात्यांनी स्वत: शहरात फिरून गरजवंतांपर्यंत धान्याच्या किट पोहचविल्या. त्याचा लाभही मोलमजुरी करणाऱ्यांना मिळाला.

वणीत धान्यासाठी गरजूंची धावाधाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : एकीकडे दानदात्यांकडून वणी शहरातील गरजवंतांना धान्याचे वाटप केले जात आहे. परंतु तरीही दररोज वणीच्या तहसीलसमोर अनेकजण धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. दानदाते व प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे.
वणी तहसील परिसरात दररोज ५० व त्यापेक्षा अधिक लोक धान्याच्या गरजेपोटी येत आहेत. राशन दुकानातून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे वितरण शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे शहरातील अनेक दानदात्यांनी स्वत: शहरात फिरून गरजवंतांपर्यंत धान्याच्या किट पोहचविल्या. त्याचा लाभही मोलमजुरी करणाऱ्यांना मिळाला. परंतु तरीही तहसीलपुढे होणारी गर्दी सर्वांची चिंता वाढविणारी ठरत आहे. गुरूवारी वणी तहसील परिसरातील पुरवठा विभागासमोर अनेक महिला व पुरूष एकत्रितरित्या ठिय्या देऊन बसून असल्याचे चित्र पहायला मिळाले. विचारणा केली असता, राशन कार्ड अपडेट करण्यासाठी आम्ही आलो असल्याचे त्यातील काहींनी सांगितले, तर काहीजणांनी आम्ही धान्यासाठी आल्याची माहिती दिली.
केवळ तहसील कार्यालयच नाही, तर शहरातील अनेक नेत्यांच्या घरापुढेही दररोज काही महिला व पुरूष आम्हाला धान्य मिळत नाही, अशा तक्रारी करित गर्दी करत असल्याचे चित्रदेखील पहायला मिळत आहे. यात मदत मागणाºयांची संख्या मोठी असल्याने नेत्यांचा वैतागही वाढत आहे. मदत करायची तरी किती, असा प्रश्न या नेत्यांना पडला आहे. लॉकडाऊननंतर सुरूवातीच्या काळात मदतीचा ओघ प्रचंड होता. दानदात्यांनी तसेच काही सामाजिक संस्थांनी ज्या भागात मोलमजुरी करणारे लोक वास्तव्याला आहे, त्या भागात जाऊन एका कुटुंबाला १५ दिवस किंवा त्यापेक्षाही अधिक काळ धान्य पुरेल, अशा किटचे वितरण केले होते. त्यानंतर मात्र मदतीचा ओघ कमी झाला आहे. परिणामी रोजमजुरी करणाºयांपुढील समस्या वाढल्या आहेत.