जिल्हा पोलीस अधीक्षक पदासाठी चौघांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:01:07+5:30
राकेश कलासागर, दिलीप भुजबळ, व्ही.बी. देशमुख ही प्रमुख तीन नावे आहेत. कलासागर हे सद्या सीआयडी पुणे येथे कार्यरत आहेत. यापूर्वी ते अकोल्याचे एसपी होते. त्यांचे नाव शिवसेनेकडून रेटले जात आहे. बुलडाणा एसपी दिलीप भुजबळ हेसुद्धा शिवसेनेच्या संपर्कात असून भेटी-गाठी झाल्या आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक पदासाठी चौघांची नावे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांची बदली निश्चित असून या जागेसाठी चार ‘आयपीएस’ची नावे चर्चेत आहेत.
राकेश कलासागर, दिलीप भुजबळ, व्ही.बी. देशमुख ही प्रमुख तीन नावे आहेत. कलासागर हे सद्या सीआयडी पुणे येथे कार्यरत आहेत. यापूर्वी ते अकोल्याचे एसपी होते. त्यांचे नाव शिवसेनेकडून रेटले जात आहे. बुलडाणा एसपी दिलीप भुजबळ हेसुद्धा शिवसेनेच्या संपर्कात असून भेटी-गाठी झाल्या आहे. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्यांकडून व्ही.बी. देशमुख यांच्या नावाचा आग्रह आहे. देशमुख मात्र स्वत: प्रयत्न करीत नसल्याचे सांगितले जाते. देशमुख सध्या महासंचालक कार्यालयात सहायक महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) पदावर कार्यरत आहेत. राज्य सेवेतून ते आयपीएस झाले. चौथे नाव येथील अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन (आयपीएस) याचे आहे. हसन यांना यवतमाळातच जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी द्यावी यासाठी काँग्रेसचा एक ‘विद्यमान’ तरुण नेत्याचा गट प्रयत्नरत आहे. त्यासाठी थेट दिल्लीतून राजकीय फिल्डींग लावली जात आहे.
अन् श्रीधर पोहोचले अकोल्यात
जिल्हा पोलीस अधीक्षक पदासाठी सुरुवातीपासूनच राकेश कलासागर यांच्या नावाची चर्चा आहे. याच नावाचा शिवसेनेने आग्रहही धरला. परंतु मध्यंतरी प्रशासनात फेरबदल होताच अचानक कलासागर यांचे नाव मागे पडले आणि बीड कनेक्शनमधून गुडबुकमधील जी. श्रीधर यांचे नाव पुढे आले. त्यांचीच येथे वर्णी लागणार असे मानले जात असताना त्यांची नियुक्ती अकोला एसपी पदावर झाली. अचानक हे झाले कसे? या मुद्यावरून सेना व प्रशासनही आश्चर्यचकित झाले. श्रीधर यांनी यवतमाळशिवाय अन्य पर्यायांवरही जोर दिल्याने त्यांना अकोल्यात संधी मिळाल्याचे बोलले जाते.
राष्ट्रवादी, शिवसेनेचे ‘कन्सेन्ट’ महत्वाचे
कलासागर, भुजबळ, देशमुख, नुरुल हसन यांच्यापैकी नेमकी कुणाची यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदावर वर्णी लागते, की ऐनवेळी आणखी नवे कुणाचे नाव पुढे येते याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. अखिल भारतीय सेवेच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने होतात. परंतु गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या ‘कन्सेन्ट’शिवाय कुणाचीही नियुक्ती होणार नाही, एवढे निश्चित. एसपी पदी वर्णी लागावी म्हणून चार पैकी तिघांनी ‘कन्सेन्ट’साठी स्थानिकांच्या भेटी-गाठी घेतल्याचे सांगितले जाते. नुरुल हसन यांना येथे एसपी म्हणून संधी मिळाल्यास त्यांच्या रिक्त होणाऱ्या अपर पोलीस अधीक्षक पदावर लगतच्या वाशिम जिल्ह्यातून सोईचा अधिकारी आणला जाणार आहे.
तीन वर्षे राहणारे एम. राज कुमार तिसरे एसपी
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार १ जून २०१७ ला येथे रुजू झाले होते. आयपीएसला एका ठिकाणी दोन वर्षे ठेवले जाते. मात्र राज कुमार यांनी तीन वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तत्कालीन पालकमंत्र्यांच्या खास आग्रहावरून एम. राज कुमार यांना जिल्ह्यात थांबविण्यात आले होते. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे एम. राज कुमार हे अमितेशकुमार आणि रंजनकुमार शर्मा यांच्या नंतरचे अलिकडच्या काळातील तिसरे जिल्हा पोलीस अधीक्षक ठरले आहेत.
प्रत्येक पक्षाकडून दोन-तीन नावे
दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत आयपीएसच्या बदल्यांबाबत प्रमुख मंत्र्यांची एक बैठक घेतली गेली. परंतु त्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांकडून प्रत्येकी एक-दोन नावे आल्याने ‘सरकार’ला धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी फार चर्चा न करता बैठकीतून थेट ‘मातोश्री’वर निघून जाणेच पसंत केल्याचे सांगितले जाते.
पुन्हा कार्यकारी पदावर की साईड ब्रँचमध्ये?
कार्यकारी दलात एक टर्म पूर्ण केल्यानंतर दुसरी टर्म साईड ब्रँचमध्ये अशी घटक पोलीस प्रमुखांसाठी पद्धत आहे. एम. राज कुमार साईड ब्रँचला जातात की, ही परंपरा खंडित करून पुन्हा एखाद्या जिल्हा अथवा ‘ग्रामीण’च्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा सांभाळतात, याकडे यंत्रणेचे लक्ष लागले आहे.